Sunday 22 December 2013

प्रिय डॉ.हिम्मतराव...
डॉ.हिंमतराव बावस्कर

प्रिय डॉ.हिंमतराव बावस्कर,
“खिशात शेवटची दिडकी असेपर्यंत मी वैद्यकीय व्यवसायातील भ्रष्टाचाराविरुध्द लढा देईन”
सर,तुमचे हे विधान नुकत्याच प्रसिध्द झालेल्या लॅन्सेटमध्ये वाचले आणि मला एकदम जुन्या काळी पाठ्यपुस्तकात वाचलेली आणि आता सर्वाथाने विस्मृतीत गेलेली कविता आठवली,
“भारत माते पुत्र शहाणे अमित तुला लाभले
तुझ्या कुशीला परि जन्मली काही वेडी मुले
काही वेडी मुले तयांची भडकूनी गेली मने
क्रांती पूजा केली त्यांनी रुधिराच्या तर्पणे ..!”
तुम्हांला पाहून स्वातंत्र्यपूर्व काळातील वेड्या क्रांतीकारकांची आठवण झाली तर त्यात नवल ते काय ? आणि आमच्या सारखी कोट्यावधी शहाणी’’ब्रिलियंटमुलं या देशात सुखात नांदत असताना तुम्हांला वेडे म्हणावं नाही तर काय करावं ?
कुठल्या तरी डायग्नोस्टिक लॅबला तुम्ही तुमच्याकडे आलेला पेशंट एम.आर.आय.साठी रेफर करावा आणि त्या लॅबच्या मालकाने (?डॉक्टरने) त्या बदल्यात तुमची प्रोफेशनल फी म्हणून प्रामाणिकपणे तुमचा वाटा चेकनं अदा करावा आणि त्या बद्दल त्याचे आभार न मानता तुम्ही चक्क मेडीकल कौन्सीलकडे त्याची तक्रार करावी?टोटली अनप्रोफेशनल !आता याला वेडेपणा म्हणावे नाही तर काय ? बरं यापूर्वीही असा वेडेपणा कोणी केला नाही,अशातला भाग नाही. १९९६ मध्ये डॉ.एम.के.मणी या नेफ्रालॉजिस्टनेही अशी तक्रार केली होती. त्यावर काही कारवाई करायला एम सी आयला वेळ मिळाला नाही,काय करणार? मर्दानं चहाला आन सवाष्णीनं कुकवाला कधी नाय म्हणू नाही”,अशी आपली जुनी रीत.लक्ष्मीचंही तसंच आहे,ती कोणत्या का वाटेनं येईना,शहाणी माणसं तिला नाही म्हणत नाहीत.म्हणून तर त्यांना शहाणं म्हटलं जातं.आता तुम्ही ज्या मेडीकल कौन्सिलकडे तक्रार केली आहे त्या संस्थेचे बरीच वर्षे प्रमुख असलेल्या केतन देसाईंचेच उदाहरण घ्या ना एकावर नेमकी किती शून्य दिली म्हणजे त्यांच्याकडे सापडलेल्या बेनामी संपत्तीची मोजदाद करता येईल,हे व्यवहाराचं गणित न उमजणा-या वेड्यांना कसे कळणार ? पण सारी मजा ही शून्यं वाढविण्यातच आहे.अर्थात केतन देसाईवर कोणी खोटेनाटे आरोप केले असण्याची शक्यताही नाकरता येत नाही.कारण त्या सा-या आरोपातून देसाईंची निर्दोष सुटल्याचे ऐकतो.असो, प्रत्येक गोष्टीतील उपकथानके कुठं कळतात आपल्याला ?
 माझ्या लहानपणीची एक गोष्ट मला आठवते.शाळेत असताना तू कोण होणार ?’असे कोणी म्हटले की मी अंतःस्फूर्तीने डॉक्टरअसे उत्तर देई.मी आठवी नववीत असताना शेवाळे सर नावाचे माझे शिक्षक माझ्या वडिलांना कौतुकाने म्हणाल्याचे आठवते,”आप्पा,आता काय तुमचा राजू डॉक्टर होणार म्हणजे काय पैसाच पैसा...!”
डॉक्टर झाल्यावर पैसाच पैसा कसा काय येतो, हे मला कळायचे ते वय नव्हते.माझ्या डोळ्यांसमोर एक चित्र तरळले,मी गळ्यात स्टेथो अडकवून रस्त्याने चाललो आहे आणि लोक माझा,माझ्या डॉक्टरकीचा जयजयकार करत माझ्यावर पैसे उधळत आहेत.अर्थात बाल कथा –किशोरकथा वाचण्याच्या त्या वयात या पेक्षा वेगळी फॅंटसी माझ्या मनात येणे शक्यही नव्हते. वयाच्या बाराव्या वर्षी मला आणखी काय सुचणार? पण डॉक्टर झालो.अवघ्या चार हजार लोकसंख्येच्या गावात काम करु लागलो आणि अवघ्या काही दिवसातच पैसाच पैसाया रहस्य कथेची उकल झाली.आठवडाभरातच माझ्या छोट्याशा गावातील मेडिकल दुकानदार मला भेटला.ठराविक कंपनीचे ठराविक औषध महिना दोन महिन्यात खपविले तर किती लाभ मिळेल,टीव्ही फ्रीज,कार आणि काय काय मिळेल,कोणकोणत्या टूर कंपनी स्पॉन्सर करेल,हे तो समजावून सांगून,माझे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करुन निघून गेला. मी अवाक ...!
  आणि त्याचवेळी जिल्ह्याच्या तालुक्याच्या गावातील मोठेमोठे प्रॅक्टीशनर्स गेस्टहाऊसला, चांगल्या हॉटेलात  नित्यनेमाने जेवणावळी आयोजित करत होते. त्यातील अर्थपूर्ण व्याख्याने नेहमीप्रमाणे माझ्या बथ्थड डोक्यात घुसली नाहीत,मला समजली नाहीत. पण मला आतून वाटत राहिले की,काहीतरी प्रचंड चुकते आहे.वाटले की,नोबल प्रोफेशन आपला आत्माच हरवते आहे. अर्थात काही सन्माननीय अपवाद प्रत्येक क्षेत्रात असतातच...सुदैवाने मलाही ते भेटले. अडल्या नडल्या पेशंटची फी  माफ करुन आणि वर त्या गरीब पेशंटला घरी जाण्यासाठी प्रवासखर्चाला पैसे देणारे डॉक्टरही मी पाहिले. आपले कौशल्य,प्रामाणिक मेहनत आणि रुग्णाप्रती असलेली निष्ठा यामुळे ही माणसे सर्वार्थाने मोठी असतात,होतात. पण अपवादाने नियमच सिध्द होतो,नाही का?
        असे काही, राहवले नाही म्हणून एका डॉक्टर मित्राशी बोललो,तो म्हणाला,”तू  विनाकारण फार विचार करतो आहेस”, आणि पुढे माझ्या खांद्यावर थोपटत हसत म्हणाला,” अबे,घोडा अगर घाससे दोस्ती करेगा तो खायेगा क्या ?” मी त्याच्याकडे पाहतच राहिलो. मी डॉक्टर असलेल्या कवी पेक्षा कवी असलेला डॉक्टरअधिक होतो आणि आहे. म्हणून मी घोडा आणि घास या रुपक अलंकाराचा विचार करत राहिलो.आजही तो थांबलेला नाही. तुमची कट प्रॅक्टीसच्या विरोधात केलेल्या तक्रारीची बातमी वाचली आणि थबकलेला तो विचार प्रवाह पुन्हा सुरु झाला. गवतासोबतची माझी मैत्री घोडा असूनही मला कधी सोडता आली नाही पण गवताशी इतर घोड्यांनी केलेले शत्रुत्व कधी मोठ्या आवाजात बोलताही आले नाही,हे ही तेवढेच खरे! आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा मोठ्या आवाजात या गोष्टी बोलू लागला तेव्हा खूप आनंद वाटला. आजूबाजूला जे घडते आहे त्याला योग्य दिशा देणे आपल्या आवाक्याबाहेर आहे असे मानणारा प्रत्येकजण आशा निराशेच्या पेंडुलमवर ये जा करत असतो. आज तुम्ही दाखविलेल्या नव्या किरणाने मी पुन्हा या पेंडुलमच्या आशेच्या टोकाकडे सरकलो आहे.
            डॉक्टर,तुम्हांला भेटलो कधीच नाही मी पण तुमच्याबद्दल वाचलंय,ऐकलंय खूप ! डॉ.हिंमतराव,खूप कमी व्यक्तींना त्यांना शोभेल असे नाव लाभते नाहीतर सर्वसाधारणपणे नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा,’ अशी परिस्थिती सर्वत्र पाह्यला मिळते.वैद्यकीय व्यवसायातील कट प्रॅक्टीस सारख्या भ्रष्टाचाराविरुध्द आवाज उठवायला हिंमत लागते. तुम्ही विंचूदंशावर केलेले संशोधन तर जगप्रसिध्द आहे. एका वेड्या निष्ठेने,जिद्दीने तुम्ही केलेल्या या संशोधनामुळे असंख्य रुग्णांचे प्राण वाचले आहेत,उद्याही वाचतील.रानावनात फिरणा-या या विंचवावर तर नेमका उतारा सापडला तुम्हांला पण आता खूप मोठ्या विंचवावर स्वारी करायला निघाला आहात तुम्ही..!
शाहीर साबळे आणि मंडळींनी गायलेले विंचू चावला,विंचू चावलाहे भारुड कोण विसरेल ? या भारुडात गमती जमतीतून या विंचवाचे खरे स्वरुप आपल्यासमोर येते-
“मनुष्य इंगळी अतिदारुण
मज नांगा मारिला तिनं ...!”
लोभ,मोहाचे रसायन आपल्या नांगीत भरुन अवघा माणूसच विंचू झाला आहे.एकमेकांना दंश करतो आहे.या विंचवावरी उतारा शोधण्याची सुरुवात तुम्ही केली आहे.या शोधयात्रेत मी तुमच्यासोबत आहे,हे सांगण्यासाठी हा पत्रप्रपंच...!एकनाथांनी पुढे लिहले आहे –
“या विंचवावर उतारा
तमोगुण मागे सारा
सत्वगुण लावा अंगारा
अन विंचू इंगळी उतरे सरसरा...!”
   आणि म्हणूनच हा उतारा शोधणे म्हणजे माझी,तुमची आणि अवघ्या व्यवस्थेचीच झाडाझडती घेणे आहे तरच हा उतारा गवसेल आणि किंचित राहिली फुणफुण,शांत केली जनार्दने’, असे म्हणत शांतपणे सुस्काराही टाकता येईल.पण ही फुणफुण शांत करणारा जनार्दनकोणी एक व्यक्ती नाही,हा अवघा जनता जनार्दन आहे,याचे भान माझ्यासारख्या अगणित तथाकथित शहाण्यांना येणे आवश्यक आहे. कारण ही फुणफुण शांत करणारी ताकद कोण्या एका व्यक्तीमध्ये नाही ती इथल्या प्रत्येकात,तुमच्या माझ्यात आहे.आणि म्हणूनच अरविंद केजरीवाल,आण्णा हजारे असे आयकॉनायझेशन करणा-या आपल्या समाजात लोक तुम्हांलाही विंचूवाले बाबाकरुन मखरात बसवतील आणि कट प्रॅक्टीससह सारे दंश नित्यनेमाने सुरुच राहतील. म्हणूनच ही लढाई सर्वांची आहे, डॉक्टरांची आहे तितकीच पेशंटचीही, राजकीय धुरींणाची आहे तितकीच माध्यमांचीही ! ज्या समाजातील डॉक्टर भ्रष्ट आहेत तिथले शिक्षक,पत्रकार,राजकारणी,प्रशासक सारेच एकाच बोटीत असतात. डॉक्टर भ्रष्ट पण शिक्षक उत्तम किंवा त्या उलट ... असे कधी असत नाही कारण वेगळ्यावेगळ्या क्षेत्रातील माणसं एकाच समाजातून आलेली असतात आणि म्हणूनच वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींचा सामना करताना हे आंतरसंबंधाचे जाळे समजावून घेऊन आपल्याला अधिक समंजसपणे,होलिस्टिक पध्दतीने जायला हवे.
  शिक्षकाच्या गरीब असण्याचा आग्रह धरणारे गांधी कधी डॉक्टरांबद्दल काही म्हटल्याचे माझ्या वाचनात आले नाही पण मला नेहमी वाटते,वैद्यकीय क्षेत्रात अपप्रवृत्तींचा मोठ्या प्रमाणाव्रर शिरकाव होण्याची सुरुवात वैदयकीय आणि एकूणच शिक्षणाच्या अनिर्बंध खाजगीकरणातून झाली आहे.शिक्षणच जेव्हा बाजारात येऊन बसले आणि मॉलमधील चकचकीत वस्तू बनले तेव्हापासून डॉक्टरांचे दवाखानेही बिझनेस सेंटर झाले.आज सत्तर टक्केहून अधिक खाजगी वैदयकीय महाविद्यालये राजकीय पाठिंबा असणा-या शिक्षण सम्राटांची आहेत. सोलापूरात राहणारा डॉक्टर कागदावर तिरुपतीच्या कॉलेजवर प्राध्यापक म्हणून काम करत असतो आणि फलटणचा कोणी करीमनगर कॉलेजच्या पेरोलवर असतो.कॉलेजची आणि त्याची भेट होते केवळ एम सी आय तपासणीच्या वेळी अथवा मुलांच्या परीक्षेच्या वेळी..! नव्या माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात आपण अशी रिमोट टीचिंगची अभिनव पध्दत शोधून काढली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना जाणीवपूर्वक सवतीच्या मुलाची वागणूक देऊन ती निरुपयोगी कशी होतील,हेच जणू पाहिले जात आहे.ही अनास्था आपल्या मान्यवर वैद्यकीय संस्थांसाठी स्लो पॉयझिनिंग सारखी आपल्या व्यवस्थेत भिनत चालली आहे. वैद्यकीय शिक्षणातील ही अनागोंदी वैद्यकीय व्यवसायातील बजबजपुरीला खतपाणी घालते आहे.
 पण आपण नमोंचा इतिहासाचा तास घेण्यात गर्क आहोत,युवराजांना राजकीय समज शिकवण्यासाठी उत्सुक आहोत,तेजपालचे तारुण्य आणि आसारामांची सकाम प्रवचने याबद्दल गॉसिपींग करण्यात आपल्याला रस आहे पण इकडे आपले सार्वजनिक आरोग्य रुग्णालयाच्या खाटेवर दीनवाणे होऊन पडले आहे, याचे कोणालाच भान नाही.डॉक्टर,तुम्ही कट प्रॅक्टीसबद्दल आवाज उठवून या रुग्णाची केस हिस्ट्री सांगायला सुरुवात केली आहे.कट प्रॅक्टीस हे केवळ एक लक्षण आहे.रुग्णाचा इतिहास आपण जसजसा तपासत जाऊ तसतसे या आजाराची पाळेमुळे या व्यवस्थेच्या शरीरात किती खोलवर गेली आहेत, हे समजत जाईल.आणि सार्वजनिक आरोग्य हा राजकीय अजेंड्यावरील पहिल्या रांगेतील विषय बनत नाही तोवर काही या रुग्णावर आणि त्याच्या दुर्धर आजारावर रामबाण उपाय करणे, आहे.
डॉक्टर,आपण पेटविलेल्या ठिणगीने उद्याच्या पहाटेची वाट दाखविली आहे.या वाटेने चालायला मात्र प्रत्येकाने हवे.
एका नव्या दिशेसोबतच मूठभर धैर्य दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
आपला,

प्रदीप आवटे. 

dr.pradip.awate@gmail.com

सदर लेख साप्ताहिक 'लोकप्रभा' च्या दिनांक २७ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रसिध्द झाला आहे. सोबत लिंक दिली आहे.