Tuesday 21 October 2014

संगीत (?) संशयकल्लोळ



संगीत (?) संशयकल्लोळ
      उत्तम कथाकार असलेल्या चंद्रकांत गुरवांशी संध्याकाळी फिरायला जाताना होणारा संवाद हा माझ्या केतूरच्या वास्तव्यातला एक अविस्मरणीय भाग. आज त्यांनी सांगितलेली एक कथा आठवते.ही कथा त्यांनी नुकतीच वाचली होती. आज या कथेचा लेखक नेमका कोण हे मला स्मरत नाही.मला वाटते बहुधा शन्नांची असावी पण कथा मात्र माझ्या आजही लख्ख लक्षात आहे. दिवेलागण किंवा तत्सम काही नाव असलेली ही कथा. एक वानप्रस्थाश्रमाच्या टप्प्यातील जोडपे. एक मुलगा आहे या जोडप्याला पण तो नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परगावी. या जोडप्याला लग्नानंतर बरेच दिवस मूल होत नसते, अगदी लग्न होऊन दहा बारा वर्षे झाली तरी पाळणा हलत नव्हता. एके दिवशी त्यांचा एक कौटुंबिक मित्र काही कामाच्या निमित्ताने त्यांच्याकडे येतो आणि आठ दहा दिवस राहून निघून जातो. त्या आसपासच तिला दिवस जातात. दोघेही आनंदतात.मुलगा होतो. मुलाच्या पाठीवर मात्र काही होत नाही. आता साठी ओलांडलेला तिचा नवरा तिला एकदा विचारतो, “एक विचारु?”
“विचारा ना,परवानगी कसली मागताय?”
विचारु की नको अशा संभ्रमात सापडलेला तो म्हातारा विचारतो,“मला खरं खरं सांग, आपला मुलगा कुणाचा आहे?”
आपला मुलगा नक्की आपलाच आहे की त्या मध्येच आपल्या घरी येऊन गेलेल्या मित्राचा,हा संशय जवळपास तीस वर्षे हा गृहस्थ मनात वागवत असतो. वारुळात फिरणा-या विषारी सापासारखा हा संशय त्याच्या अबोध मनात सतत वळवळत असतो पण त्याचं सभ्य सुसंस्कृत मन आणि बायकोवरला इतक्या वर्षाचा विश्वास (?) त्याला हा प्रश्न विचारायला परवानगी देत नसतो. पण अखेरीस हा साप बाहेर पडतो एका जळजळीत प्रश्नाच्या रुपाने. या प्रश्नाने ती अंतर्बाह्य हादरते. हा माणूस इतकी वर्षे हा संशय मनात बाळगून माझ्याशी संसार करत होता,या वास्तवाने ती कमालीची व्यथित होते.ही व्यथा तिच्या थकल्या ह्रदयाला पेलत नाही आणि ती गतप्राण होते. संध्याकाळ आली,‘दिवेलागण झाली तरी हा सरपटत सरपटत सहजीवन पोखरणारा संशय पाठ सोडत नाही,हे सांगणारी ही कथा.

  स्त्री पुरुष नात्यातल्या या संशयाचे पोस्टमार्टम करावयाचे म्हणजे आपल्या पुरुषपणाचेच पोस्टमार्टम करणे आहे आणि ते सोपे नाही.हा पुरुष आपल्यामध्ये कधी जन्मतो ?त्याचा जन्म कधी होतो? स्त्री बद्दल बोलताना सिमॉन द बुवा म्हणालीच आहे,Woman is not born, she is made.” पुरुषाबाबतही थोड्याफार फरकाने असेच म्हणता येईल का ? मला माझ्याच आयुष्यातला एक प्रसंग आठवतो, माझे लग्न झाले त्या संध्याकाळची गोष्ट. मी आणि माधुरी फिरायला निघालो होतो आणि मला अचानक जाणवले की माधुरीबाबत अगदी कॉन्शियस झालो आहे. रस्त्यावरुन येणा-या जाणा-याने तिच्याकडे कटाक्ष टाकला तरी मी अनकम्फर्टेबल होत होतो. खरे तर माझा प्रेम विवाह.लग्नापूर्वीही आम्ही अनेक वेळा मिळून फिरायला गेलो होतो पण आज मला काय झाले होते ? मी अचानक तिला सांगितले, “एका खांद्यावरुन पदर का घेतलास? पदर दोन्ही खांद्यावरुन घेत जा.” आज मागे वळून पाहतो तेव्हा मला जाणवते,माझा नवरा झाला होता.प्रियकराच्या भूमिकेतून मी एकदम नव-याच्या भूमिकेत जात होतो आणि सांधेबदल करताना माझी गाडी खडखडत होती आणि मी घरी,आजूबाजूला,शेजारी पाजारी पाहिलेले ऐकलेले अनेक नवरे क्षणार्धात माझ्या मनावर माझ्याही नकळत अधिराज्य गाजवू लागले होते आणि मी संमोहित झाल्यासारखा वागत होतो.
    स्त्री पुरुष नात्यामधला संशय हा खरे तर दुहेरी आहे म्हणजे पुरुषाच्या बाजूने घेतला जाणा-या संशया प्रमाणेच स्त्रीच्या बाजूने घेतला जाणारा संशय हा ही एक आयाम त्याला आहे. पण एकूणच पुरुषसत्ताक कुटुंब आणि समाज व्यवस्थेत स्त्रीचा पुरुषावरील संशय हा गौण आणि बहुधा परिणामशून्य ठरतो. या विवेचनाचा रोख म्हणूनच एकूण पुरुषाच्या बाजूने घेतल्या जाणा-या संशयाकडे आहे. स्त्री पुरुष नात्यातल्या या पुरुषी संशयीवृतीची मुळे पुरुषाच्या पुरुष असण्यात आणि पुरुष धार्जिण्या व्यवस्थेत दडली आहेत. इथल्या समाजव्यवस्थेने स्त्रीला स्वातंत्र्य नेहमीच नाकारले आहे. “न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती”, हे इथे उच्चरवाने नेहमी सांगितले गेले आहे. त्यामुळे इथल्या स्त्रीची कस्टडी नेहमी कोणत्या ना कोणत्या भूमिकेतील पुरुषाकडे दिली गेली आहे.
“बालपणामध्ये बापाचं नाव
तरुणपणामधी पती हा देव
म्हातारपणामधी पोरांना भ्याव !”
हे तिचे प्राक्तन आहे आणि ते इथल्या समाजव्यवस्थेने तिला बहाल केले आहे. मुळात कस्टडी या संकल्पनेत सुरक्षा आणि कशाची तरी चोरी होण्याचे भय अध्याह्रत आहे. त्या बरोबरच जिला सुरक्षा द्यावयाची वल्गना करावयाची तिचे वस्तुकरणही त्या विचारव्यूहाचा अपरिहार्य भाग आहे. स्त्री ही एक व्यवच्छेदक वस्तू आहे कारण ती सजीव आहे.तिला तिच्या स्वतःच्या भावना आहेत. तिच्याजवळच्या ज्या संपत्तीची चोरी होईल म्हणून तिचे संरक्षण केले पाहिजे असे तिच्या कस्टोडियनना वाटते त्या संपत्तीचा विनियोग स्वतःच्या इच्छेप्रमाणे करावयाची मनिषा तिच्या मनात येऊ शकते पण मुळात तिच्याजवळ हा विवेक आहे हे कस्टोडियन्स मान्य करत नाहीत.
     म्हणूनच स्त्रीच्या जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हा निर्णय घेण्याची जबाबदारी वेगवेगळा पुरुष कस्टोडियन पार पाडीत असतो. पण सुरक्षा कशाची? स्त्रीजवळ असे काय आहे की जे हरविण्याची या पितृसत्ताक समाजव्यवस्थेला भिती वाटते. परंपरेने स्त्रीचा एक आदर्श स्टिरिओटाईप तयार केला आहे. शील ही तिची खरी संपत्ती आहे आणि या शीलाची सारी संकल्पना योनिशुचितेभोवती गिरक्या मारत असते. आणि म्हणूनच या अनुषंगाने या विवेकहीन बाहुलीवर संशय घेत राहणे ही या कस्टोडियनची प्राथमिक जबाबदारी ठरते. स्त्री पुरुष नातेसंबंधातील संशय घेणारा पुरुष हा केवळ नवराच असतो असे नाही. कॉलेजमधून घरी उशीरा परतणा-या मुलीवर बाप संशय घेतो, भाऊ नजर ठेवतो आणि पुरुषी व्यवस्थेत तयार झालेली आईही बाप - भावाला सामील होते. मुलीने आपल्या मनाविरुध्द आंतरजातीय लग्न केले म्हणून झोपलेल्या मुलीच्या डोक्यात घाव घालून तिचा खून करणारा बाप किंवा तिच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिला चिरडणारा भाऊ ही अगदी अलिकडच्या काळातील महाराष्ट्रातील उदाहरणे आहेत. संशयावरुन मारहाण,खून म्हणजे स्त्रीचा स्वमताप्रमाणे जगण्याचा अधिकारही आपली पुरुषी मानसिकता आपल्याला मान्य करु देत नाही.
    स्त्री संदर्भातील ही कस्टोडिअनशीप केवळ कौटुंबिकच असते असे नाही. मोठ्या कॅनव्हासवर ती सोशिओपोलिटिकल ही असते. अलिकडचे लव्ह जिहादहे याचेच उदाहरण. इथे धार्मिक आणि राजकीय प्रस्थापित मंडळी हिंदू मुलींच्या निखळ वैयक्तिक निर्णयावर आक्षेप घेऊन थांबत नाहीत त्यात हस्तक्षेपही करत आहेत. कारण त्यांच वैयक्तिक बाब धार्मिक आणि राजकीय अस्मितेचा विषय म्हणून पाहिली जात आहे. स्त्रीच्या योनिशुचितेभोवती कुटुंब,जात,धर्म,समुदाय यांच्या अस्मिता जोडल्या गेल्याने या वेगवेगळ्या स्तरावर तिच्या वैयक्तिक आणि लैंगिक व्यवहाराचे नियंत्रण केले जाते.जातपंचायत हे याचेच उदाहरण.
    लग्नानंतर योनिशुचितेच्या संपत्तीची रखवाली नवरा नावाच्या पुरुषाकडे येते. योनिशुचितेच्या कल्पनेतूनच स्वामित्वाची भावना जन्म घेते. पुरुषप्रधान संस्कृतीने तिच्या केलेल्या वस्तुकरणाचा हा स्वाभाविक परिपाक असतो. या योनिशुचिता आणि स्वामित्वाच्या भावनेतून पडदा,बुरखा, स्त्री जननेंद्रियाचे विद्रुपीकरण या प्रकारांचा जन्म होतो. कारण नातेसंबंधातील निष्ठा आपण केवळ शरीर संबंधापुरती संकुचित करुन टाकली आहे. त्यामुळे नात्यात आलेल्या दांभिकतेमुळे स्त्री पुरुष संबंध हा अनेकदा लहान मुलांचा चोर पोलिसांचा खेळ होऊन बसतो.
मी कोर्टी आरोग्य केंद्रात काम करित असताना या स्वामित्व आणि स्त्री शरीरावरील हक्काचा विलक्षण किळसवाणा प्रकार मी पाहिला होता.
    एकेदिवशी माझ्या ओपीडीत एक पन्नाशीचे गृहस्थ म्हणजे आपला गावाकडील शेतकरी गडी त्यांच्या सूनेला घेऊन आले होते.तिला काही तरी त्रास होत होता. मी तपासून औषधोपचार दिला. सून ओपीडीच्या बाहेर गेली पण हा गडी तसाच उभा.
“ काही काम आहे का ?”, मी विचारले.
“जरा खाजगी काम व्हतं...”, असं म्हणत ते बोलू लागले, “ ही माझी सून हाय.रांडव हाय” मला कळेचना हे काय सांगताहेत पण ते पुढं बोलतच राहिले, “ अलिकडे तिचा पाय वाकडा पडाया लागलाय.”
“ तुम्ही का सांगताय मला?”
“अवो तसं नाय मी काय म्हनतू मी असताना तिनं कशापायी बाहेर शेन खावं ? आपल्या टोपल्यातील भाकरी हाय ती आपन शेजा-या पाजा-यांच्या ताटात का वाढावी ?”
यावर काय बोलणार?मी निव्वळ सुन्न बसलो होतो.
  स्त्री लैंगिकतेविषयीच्या पुरुषी कल्पना हे स्त्री विषयक संशयाचे आणखीन एक प्रमुख कारण आहे. स्त्री आणि स्त्री लैंगिकता या विषयी पुरुषांच्या मनात एक रहस्यमय कुतूहल आहे. यातून तिच्या लैंगिकतेविषयी भन्नाट फॅण्टसी अनेकदा पुरुषांच्या मनात नांदत असतात. तिच्या लैंगिकतेची अमर्याद क्षमता,मासिक पाळीच्या विशिष्ट कालावधीतील तिची अनावर आसक्ती या संदर्भात इतक्या लोककथा,समज,गैरसमज यातून तिला दावणीला बांधायची इच्छा पुरुषी मनात अधिक प्रबळ होत जाते.या सगळ्या समज गैरसमजातूनही तिच्या बद्दलचा संशय अधिक बाळसेदार होत जातो. स्त्रीची अमर्याद लैंगिक भूक तिला व्याभिचार करायला भाग पाडते असा एक समज अनेक पुरुषांच्या मनात असतो.माझा एक मित्र म्हणे,’स्त्री ही कधीही विश्वासपात्र असू शकत नाही. ती हमखास वाकड्या वाटेने गेलेलीच असते. एकदा त्याच्यावर वैतागून मी म्हणालो,”अरे तुझी आई ही सुध्दा एक स्त्रीच आहे हे कसे विसरतोस तू..?” त्यावर तो थंड पणे म्हणाला, “तिच्यावर तरी विश्वास कसा ठेवू?सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याच माहित असतात?”
 “ आमच्या पिढीला व्हर्जीन बायको मिळणे अलमोस्ट दुरापास्त आहे.”
  “पुण्या/मुंबईतील मुली व्हर्जीन भेटणे महाकठीण..!”
अशी अर्ग्युमेंटस अलिकडे कॉलेज पोरांकडून ऐकायला मिळतात. म्हणजे आजची मेट्रोसेक्शुअल म्हणवली जाणारी पिढीसुध्दा लॉस ऑफ व्हर्जिनिटी ची खंत करते आहे.पण तुमच्या व्हर्जिनिटीचे काय रे?’असा प्रश्न ही पिढी हसत हसत डक करते म्हणजे कौमार्य हा केवळ मुलींचा गुण आहे त्याची मुलांना त्याची आवश्यकता नाही कारण शील हे स्त्रीचे खरे सौन्दर्य पुरुषांचे मात्र कर्तृत्व हेच सौन्दर्य. अशी आपल्या व्यवस्थेने स्त्री पुरुष गुणवैशिष्ट्यांची रितसर विभागणी केली आहे.
    स्त्रीच्या या अवास्तव लैंगिकतेच्या पार्श्वभूमीवर पुरुषाच्या मनातील असुरक्षितता आणि लैंगिक संबंधातील पुरुषाची मर्यादा यामुळे त्याच्या मनातील न्यूनगंड अधिक गडद होतो. त्यातून संशयाची नवनवी वर्तुळे निर्माण होत राहतात. स्त्रीयश्च चरित्रम पुरुषस्य भाग्यम.... सारखे पारंपारिक विचार ते अधिक गर्द करत जातात.
   स्त्रीची धर्मव्यवस्थेने उभी केलेली प्रतिमा हा पुरुषी संशयकल्लोळाचा वेगळा अध्याय आहे. मोहाचे दार,पापाची खाण,मोक्षातील अडचण अशा विशेषणांनी धर्माने संतांनी स्त्रीला गौरविले आहे. या सगळ्या प्रतिमेतून स्त्रीचे स्खलनशील रुप धर्मव्यवस्थेने अधोरेखित केले आहे. या सा-या घटकांनी पुरुषाच्या संशयी वृत्तीला खतपाणी घातले आहे पण या संशयाने स्त्री पुरुष नातेसंबंध पोखरले गेले आहेत. त्याचा पायाच भुसभुशीत झाला आहे. 
 या संशयाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याकरिता आपल्याला काय करायला हवे ? हा चक्रव्यूह आपण भेदू शकू ?
   हा चक्रव्यूह भेदणे सोपे नाही पण अशक्य नाही. आपल्याला आपल्या पारंपारिक पुरुषत्वाचा एक एक पदर त्यासाठी उकलावा लागेल. नव्या बदलत्या काळात हे आव्हान अधिक कठिण झाले आहे. आजच्या किमान शहरी जगात पारंपारिक कुटुंबव्यवस्थेचे पहारे तुटून पडत आहेत.चूल आणि मूल या मर्यादित क्षेत्रात अडकलेली स्त्री विशाल जगात बाहेर पडली आहे. अर्थार्जनातून आलेल्या आत्मविश्वासातून तिची कुटुंबातील भूमिका अधिक असर्टीव होते आहे. नव्या ग्लोबल जगात ती हवीहवीशी मोकळिक अनुभवते आहे पण त्याचवेळी जगभर पसरलेल्या मार्केटमध्ये तिचे वस्तूकरणही कल्पनातीत वेगाने होते आहे. आता लैंगिक संबंधाभोवतीचा पारंपारिक सॅक्रेडनेस विरु लागला आहे. पण त्यामुळेच स्त्री पुरुष शरीर संबंध अधिक अधिक किरकोळ स्वरुपाचे होत चालले आहेत. या नव्या पार्श्वभूमीवर अद्याप परंपरेची कात पुरती न टाकलेला पुरुष पुरता भांबावला आहे आणि स्त्री पुरुष संबंधांचे आभाळ संशयाच्या धुराने व्यापून जावे अशी परिस्थिती आज समोर उभी ठाकली आहे. फॅमिली कोर्टात ट्रॅफिक जॅम व्हावे एवढी गर्दी झाली आहे,संशयाच्या धुराने प्रत्येकाचे डोळे चुरचुरत आहेत.
    अशावेळी स्त्री पुरुष नातेसंबंधांची व्याख्याच आपल्याला नव्याने समजावून घ्यायची आवश्यकता आहे.बट्रांड रसेलने नेमके म्हटले आहे,The essence of a good marriage is respect for each other's personality combined with that deep intimacy, physical, mental and spiritual, which makes a serious love between man and woman the most fructifying of all human experiences.  Such love, like everything else that is great and precious, demands its own morality, and frequently entails a sacrifice of the less to the greater; but such sacrifice must be voluntary, for where it is not, it will destroy the very basis of the love for the sake of which it is made.”
 आपले नाते केवळ स्कीन डीप असता कामा नये. त्यासाठी स्त्रीला प्रथम समान योग्यतेची माणूस म्हणून समजून घ्यायला हवे. आपण तिचे कस्टोडियन नाही हे उमजायला हवे. परस्परांच्या शारिरिक,मानसिक गरजा समजावून घ्यायला हव्यात त्यांच्या पूर्ततेचा प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवा म्हणजे म्हणजे नात्यातला दांभिकपणा कमी होईल.रसेलने म्हटल्याप्रमाणे आपल्या नात्याला मानसिक,भावनिक आणि ख-या अर्थाने आध्यात्मिक आयामही मिळायला हवेत. शरीर संबंधांना पावित्र्याचे नाहक वलय नको,पण त्यांचा केवळ पोरखेळ होऊन जाऊ नये याची काळजी आपल्याला घ्यावयाची असेल तर आपल्याला आपल्या नात्याचा पाया अधिक भक्कम,अधिक व्यापक करायला हवा. योनिशुचितेच्या भ्रामक कल्पनातून बाहेर यायला हवे. शरीर संबंधातील एकनिष्ठतेहून या ह्रदयीचे त्या ह्रदयी होणा-या प्रक्रियेने आपले नाते अधिक श्रीमंत होत असते,हे आपण समजावून घ्यायला हवे. पारंपारिक विवाह संस्थेकडून झालेल्या अपेक्षाभंगातून आपण लिव्ह इन रिलेशनशिप सारखे प्रयोग ही सुरु केले आहेत. पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या ओझ्यात दबलेल्या स्त्री पुरुष नातेसंबंधातील हरवलेले चैतन्य पुन्हा शोधण्याचा हा प्रयत्न आहे अर्थात पुरुषसत्ताक,पितृसत्ताक व्यवस्थेचा पाया उखडल्याशिवाय नवा इमला रचता येणार नाही,हे ही तेवढेच खरे.
असे झाले तरच या अनादि कालापासून सुरु असलेल्या या संगीत संशयकल्लोळ नाटकाचा अखेरचा पडदा पडेल.
- डॉ.प्रदीप आवटे.
( ' पुरुष उवाच ' दिवाळी अंक २०१४ मध्ये प्रकाशित )

Friday 26 September 2014

जागतिकीकरणाच्या फांदीला ‘इबोला’चे वटवाघूळ



जागतिकीकरणाच्या फांदीला इबोलाचे वटवाघूळ
-- डॉ.प्रदीप आवटे.

             माबालो लोकेला हा यांबुकु गावातल्या शाळेचा मुख्याध्यापक. यांबुकु हे त्या वेळच्या झैरेतील आणि आजच्या कांगोमधील छोटेसे गाव,इबोला नदीच्या काठी वसलेले. माबालो मास्तर एक आठवडाभर मस्त नदी काठची रपेट मारुन आला आणि २६ ऑगस्ट १९७६ ला एकदम तापाने फणफणला. दवाखाना,उपचार सारे काही झाले पण ८ सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला. नंतर लक्षात आले त्याला विषाणूजन्य रक्तस्त्रावी तापाने घेरले होते.हा विषाणू नवा होता. इबोला नदीवरुन या नव्या विषाणूचे बारसे “इबोला विषाणू”असे करण्यात आले. माबालो लोकेला हा या इबोला आजाराचा पहिला ज्ञात रुग्ण.त्या वर्षी झैरे (कांगो)मध्ये जवळपास ३१८ जणांना इबोलाची लागण झाली आणि त्यापैकी २८० जण दगावले.ही इबोलाची पहिली साथ. या नंतर इबोला अधून मधून सतत भेटत राहिला आणि एखाद्या दुःस्वप्नासारखा मानवी जगताचा पाठलाग करत राहिला. १९७६ ते आजतागायत इबोलाचे जवळपास ३० उद्रेक आपण पाहिले आहेत. त्याच्याबद्दलची भिती एवढी सर्वव्यापी आहे की १९९५ साली वोल्फगॅंग पीटरसनने इबोला सदृश्य मोटाबा या काल्पनिक आजारावर “आऊटब्रेक” नावाची हॉलीवूड फिल्म तयार केली. डस्टीन हॉफमन या नामवंत अभिनेत्याने त्यात प्रमुख भूमिका केली आहे. या चित्रपटाने इबोलाची ही भिती अत्यंत भेदकपणे सर्वदूर पोहचविली.

  .... आणि ७ ऑगस्ट २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने सध्या पश्चिम आफ्रिकेतील चार देशांमध्ये सुरु असणारा इबोला उद्रेक ही सार्वजनिक आरोग्यातील आंतरराष्ट्रीय आणीबाणी असल्याचे घोषित केले आणि इबोला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चर्चेचा आणि काळजीचा विषय झाला.
काय आहे हा इबोला ?
    इबोला हा एक विषाणूजन्य आजार आहे.इबोलाचा हा विषाणू हा आज मानवी जगाला ज्ञात असलेला सर्वाधिक घातक विषाणू आहे. या आजारातील मृत्यूचे प्रमाण ५० ते ९०%इतके प्रचंड आहे.
   आज सुरु असलेला इबोलाचा उद्रेक हा डिसेंबर २०१३ पासून सुरु झाला आहे. गिनी,सिएरा लिओन, लायबेरिया आणि नायजेरिया या चार देशांसोबत आता कांगोमध्येही हा उद्रेक सुरु आहे. २८ ऑगस्ट २०१४ पर्यंत या देशांमध्ये ३०६९ इबोला रुग्ण आढळले असून त्यापैकी १५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने या आजवरच्या सर्वात मोठ्या इबोला उद्रेकात मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी म्हणजे ५३%च्या आसपास आहे. गिनी मध्ये ते ६६%आहे तर सिएरा लिओन मध्ये ४२ % आहे.
ताप, डोकेदुखी, थकवा, अंगदुखी, घसादुखी, उलटी जुलाब, अंगावर रॅश उमटणे, रक्तस्त्राव ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.  या आजारात मूत्रपिंड आणि यकृताच्या कामात बिघाड होतो.

इबोला पसरतो कसा?
   वटवाघळाच्या काही प्रजाती, चिपांझी,गोरिला, माकडे आणि इतर प्राण्यांमार्फत हा आजार पसरतो.ज्या व्यक्ती या बाधित प्राण्यांच्या शरीर स्त्रावांच्या संपर्कात येतात त्यांना हा आजार होण्याची शक्यता असते. या बाधित प्राण्यांचे मांस खाणे हे देखील अनेकवेळा इबोलाला आमंत्रण देणारे ठरते.
  पण एकदा का आजार माणसात आला की तो एका रुग्णापासून दुस-या निरोगी माणसाला होऊ शकतो. माणसापासून माणसाला होणारा प्रादुर्भावही मुख्यत्वे शरीर द्रव्यामार्फत होतो. रक्त आणि इतर शरीर द्रव्यामार्फत या विषाणूचा प्रसार होत राहतो. मानवी वीर्यातही हा विषाणू सात आठवड्यांपर्यंत सापडतो.त्यामुळे एच आय व्ही,कावीळ ब या प्रमाणेच इबोला देखील शरीर संबंधांमार्फत पसरु शकतो.
   रुग्णाची सेवा करणारे नातेवाईक तसेच डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी यांना हा आजार होण्याची शक्यता सर्वाधिक आहे आणि म्हणूनच रुग्णांवर उपचार करताना आणि त्यांची शुश्रुषा करताना त्यांच्या शरीरद्रव्याशी आपला संबंध येणार नाही, याची दक्षता आरोग्य कर्मचा-यांनी घेणे आवश्यक आहे. या उद्रेकात खूप मोठ्या प्रमाणावर आरोग्य कर्मचारी इबोलाला बळी पडताना दिसत आहेत.
   अगदी ताजे उदाहरण म्हणजे सिएरा लिओन देशातील डॉ.शेख उमर खान हे होय.  २९ जुलै २०१४ रोजी ते इबोलाने गेले.हा माणूस गेले दहा वर्षे इबोला रुग्णांवर उपचार करत होता.त्यांनी आजवर शंभरहून अधिक इबोला रुग्णांवर उपचार केले होते. या सा-यांमधील धोका त्यांना कळत होता पण तरीही एका प्रचंड निष्ठेने ते हे काम करत होते. “माझे माझ्या जगण्यावर प्रचंड प्रेम आहे.इबोला रुग्णावर उपचार करण्यातला धोका मला समजतो आणि म्हणूनच मी सर्वप्रकारची काळजी घेतो.हे काम करताना होणारा आनंद या धोक्यापेक्षा कितीतरी मोठा आहे,” आपल्या मृत्यूपूर्वी दिलेल्या शेवटच्या मुलाखतीत ते म्हणाले होते. इबोला भोवती दाटलेले भयाचे वलय त्यांना पुसायचे होते आणि म्हणूनच आपल्या केमेना येथील रुग्णालयातील ब-या होऊन जाणा-या इबोला रुग्णाला ते जादूची झप्पी देऊन निरोप द्यायचे. त्याच्या जवळच्या लोकांनी त्याला वाळीत टाकू नये, हा उद्देश त्यामागे असायचा. पण इबोलाशी लढणारा जिद्दी योध्दा या लढाईत कामी आला. “आम्ही आज आमचा नॅशनल हिरो गमावला,” या शब्दांत सिएरा लिओनच्या आरोग्य मंत्र्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.
   घातक आणि धोकादायक आजार हे वैद्यक शास्त्रासमोरचे आव्हान नेहमीच होते. कॉलरा काय किंवा प्लेग काय सा-यांमध्येच ही भिती होती पण येथे पळपुटी माणसे कामाची नसतात. आपल्या व्यवसायाप्रती कमालीची निष्ठा, धैर्य आणि त्या सोबतच आवश्यक ती खबरदारी घेणारी माणसेच या आणीबाणीच्या प्रसंगी महत्वाची ठरतात. आणि म्हणूनच इबोला रुग्णांवर उपचार करताना पीपीई सारखी संरक्षक साधने वापरणे,रुग्णाच्या दूषित गोष्टींची योग्य विल्हेवाट लावणे  (जैववैद्यकीय कच-याचे व्यवस्थापन) या सर्व बाबी महत्वाच्या आहेत. इबोला हा आजार स्वाईन फ्ल्यू सारखा हवेतून पसरत नाही त्यामुळे तो खूप वेगाने पसरु शकत नाही, हे ही महत्वाचे..! स्वाईन फ्ल्यूने अवघ्या अडीच महिन्यात सारे विश्व पादाक्रांत केले होते.
   या आजाराचा अधिशयन कालावधी २ ते २१ दिवस आहे. आजमितीला या आजारावर कोणतेही औषध उपलब्ध नाही. काही प्रायोगिक औषधे वापरण्याची परवानगी जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे खरे पण आजमितीला रुग्णाला लक्षणाधारित उपचार देण्याव्यतिरिक्त आपल्या हातात काहीच नाही. आपल्याकडे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे आणि राष्ट्रीय साथरोग नियंत्रण संस्था,नवी दिल्ली येथे या आजाराच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे.





इबोला भारतात येऊ शकतो काय?
  हा आपल्या सर्वांच्याच काळजीचा आणि चिंतेचा विषय. आज जवळपास पंचेचाळीस हजार भारतीय पश्चिम आफ्रिकेतील देशात आहेत. इबोला आपल्या देशात येऊ नये,यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. या देशातून येणा-या प्रवाशांची यादी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आरोग्य यंत्रणा संबंधित राज्य आरोग्य विभागाला देत असून या प्रवाश्यांचे त्यांनी इबोला ग्रस्त देश सोडल्यापासून पुढील तीस दिवस दैनंदिन सर्वेक्षण करण्यात येत आहे. या पैकी कोणाला इबोला सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे.
  आंतरराष्ट्रीय प्रवास करणा-या आणि विशेषतः इबोला ग्रस्त भागातून येणा-या प्रवाशांना त्यांची जबाबदारी समजावून सांगण्यात येत आहे. इबोला ग्रस्त भागातून आल्यानंतर जरी त्यांना काही लक्षणे नसतील तरी या आजाराचा अधिशयनक कालावधी २१ दिवसाचा आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी आपला जनसंपर्क कमीत कमी ठेवला पाहिजे आणि आलेल्या दिवसापासून एक महिन्याच्या काळात त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून त्यांना दिलेल्या मार्गदर्शक पत्रकातील फोन क्रमांकावर फोन करुन त्याची कल्पना द्यायला हवी. हे त्यांच्या,कुटुंबाच्या  आणि  संपूर्ण समाजाच्या आरोग्या करिता आवश्यक आहे.
   इबोला ज्या प्रकारे पसरतो हे लक्षात घेतल्यास,व्यवसाय किंवा पर्यटनासाठी या देशांमध्ये गेलेल्या प्रवाशांना इबोलाची बाधा होण्याची शक्यता अगदी कमी असल्याचे डब्ल्यू एच ओ ने ही स्पष्ट केले असले तरी ही सारी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
   वटवाघुळ हे इबोला विषाणू प्रसारामध्ये महत्वाची भूमिका बजावते,असे अनेक संशोधनातून पुढे आले आहे. आज १९७६ च्या तुलनेत शहरीकरण झालेल्या आफ्रिकेत पूर्वी इतक्या सहजतेने इबोलाचा उद्रेक थांबताना दिसत नाही. एखाद्या गावात झालेला उद्रेक ते संपूर्ण गाव विलग करुन आटोक्यात आणणे सोपे होते पण आज मात्र आफ्रिकन देशांच्या शहरी आणि मोठ्या प्रमाणात ये जा असणा-या भागात इबोलाची लागण होताना दिसते आहे आणि म्हणूनच मागील आठ महिन्यापासून हा उद्रेक थांबायचे नाव घेत नाही आहे. जागतिकीकरणाच्या फांदीला हे इबोलाचे उलटे वटवाघूळ लटकले आहे.ते जणू आपल्या सा-या तथाकथित वैज्ञानिक प्रगतीला वाकुल्या दाखवित आहे. कॉन्स्पिरसी थेरी मानणा-या अनेकांना हा बायोटेरीरीझमचा भाग वाटतो तर काहींना औषध कंपन्यांनी केलेला बनाव वाटतो. कोणीच आज या बाबत अंतिम सत्य उमगले आहे, अशा थाटात भाष्य करु शकत नाही. आज आपल्या हातात आहे दक्षता आणि पायासमोर आहे मानवी हितासाठी अनेकांच्या त्याग आणि समर्पणाने सिध्द झालेली विज्ञानाची पाऊलवाट...! आज आपल्या सर्वांना खाली मुंडी वर पाय करायला लावणा-या या करामती वटवाघळाच्या शीर्षासनावरही उद्या उपाय सापडलेच पण तोवर हातात हात घेऊन चालू या. परस्परांची काळजी घेऊ या.

( सदर लेख साप्ताहिक लोकप्रभाच्या १९ सप्टेंबर २०१४ च्या अंकात प्रसिध्द झाला आहे. http://issuu.com/lokprabha/docs/19_sept_2014_full_issue_for_web_new/c/sl7f242)

Friday 18 July 2014

आरोग्याचे ‘अच्छे दिन’ कधी ?





आरोग्याचे अच्छे दिन कधी ?
- डॉ.प्रदीप आवटे.
                  सन १९९० हा भारतीय राजकीय आणि सामाजिक जीवनातील एक मैलाचा दगड. जागतिक अर्थकारणात झालेली उलथापालथ. रशियाच्या शतखंडीत होण्यासोबत एक ध्रुवीय झालेले जग, या पार्श्वभूमीवर विकसनशील अशा भारतासमोर नवी आव्हाने वासून उभी होती. या अत्यंत संदिग्धतेच्या धुक्यात हरवलेल्या वाटेवर भारताचे आर्थिक नेतृत्व करणारे डॉ. मन मोहनसिंग १९९१ चा अर्थसंकल्प सादर करताना बोलले होते,“I do not minimize the difficulties that lie ahead on the long and arduous journey on which we have embarked. But as Victor Hugo once said, "no power on earth can stop an idea whose time has come". I suggest to this august House that the emergence of India as a major economic power in the world happens to be one such idea. Let the whole world hear it loud and clear. India is now wide awake. We shall prevail. We shall overcome.”  नव्या एन. डी. . सरकारचा पहिला वहिला अर्थसंकल्प अरुण जेटली यांनी सादर केला तेव्हा मनमोहनसिंग यांच्या या ऐतिहासिक विधानाची पुन्हा एकदा आठवण झाली. युनियन बजेटला आपण मराठीत अर्थसंकल्प म्हणतो. आपली देश म्हणून, एक समाज म्हणून असणारी दिशा, आपले संकल्प आणि आशा यांचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात पडत असते. व्हिक्टर ह्युगोच्या ज्या विधानाचा उल्लेख मनमोहन सिंगांनी केला होता त्यातील आणखी एकानव्या आयडियाचा उगम कधी होणार, याची प्रतिक्षा भारतीय जनमानस करत आहे. ही आयडिया सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील आहे. ‘युनिव्हर्सल हेल्थ कवरेजनावाची संकल्पना आपली राजकीय बांधिलकी म्हणून आपण स्वीकारणार आहोत का, आपण गंभीरपणे घेणार आहोत का या लाखमोलाच्या प्रश्नाचे उत्तर नव्या सरकारच्या अर्थसंकल्पात शोधायला मी उत्सुक होतो. ‘वॉट ऍन आयडिया सरजी, आयडिया कॅन चेंज युवर लाईफ…!” हे जाहिरातीच्या युगात जगणा-या आपल्यापैकी प्रत्येकाला ठावे आहे पण अस्सल, -या अर्थाने आयुष्य बदलून टाकणारी आयडिया आपल्या रेंजमध्ये येत नाही किंवा आपण तिच्या रेंजमध्ये जात नाही, असे काहीतरी सतत घडते आहे. युनिव्हर्सल हेल्थ कवरेज या संकल्पनेच्या बाबतीत हे शतप्रतिशत खरे आहे. 
   सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आपण आपल्या या वर्षीच्या अर्थसंकल्पाकडे पाहिले तर काय दिसते? पहिला ठळक मुद्दा असतो, किती पैसा मिळाला ? २०१०-११ पासून आजपर्यंत सार्वजनिक आरोग्यावरील तरतूद २२ हजार कोटींवरुन ३४ हजार कोटींवर आलेली दिसते. अर्थात आपल्या एकूण सकल उत्पादनाच्या तीन टक्के तरतूदीपेक्षा कितीतरी कमी. गेले कितीतरी वर्षांपासून नियोजन आयोगाच्या विविध समित्यांपासून ते तज्ज्ञांपर्यंत सर्वजण सार्वजनिक आरोग्यासाठी जीडीपीच्या किमान तीन टक्के तरतूद असावी म्हणून कंठशोष करत आहेत. पण आरोग्याच्या ताटात एवढे वाढप करण्याचे धाडस कोणीही करावयाला तयार नाही. गाडी दीड पावणेदोन टक्क्यांच्या पुढे जायला तयार नाही. खरे तर देशभरात सार्वजनिक आरोग्याची स्थिती चिंता करण्याजोगी आहे. अमर्त्य सेन यांच्या गतवर्षी प्रकाशित झालेल्याऍन अनसर्टन ग्लोरीइंडिया ऍंड इटस् कॉन्ट्राडिक्शनस्या ग्रंथातील एका निबंधाचे शीर्षकच मोठे बोलके आहे – ‘इंडियाज् हेल्थ केअर क्रायसिस’..! म्हणजेच आज सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या सा-या समस्येवर कल्पकतेने मार्ग काढणे आवश्यक आहे. या सा-या पार्श्वभूमीवर नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात काय दिसते, हे पाहणे महत्वाचे ठरावे

   अरुण जेटली यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्यावरील तरतूदीत जरी फारमोठी घसघशीत वाढ केलेली नसली तरी आधीच्या सरकारने सुरु केलेल्या लोकोपयोगी योजना कार्यान्वित ठेवतानाच काही नवीन महत्वपूर्ण योजनांचे सूतोवाच अर्थमंत्र्यांनी केले आहे. सुमारे सात हजार कोटींचा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट हा नव्या सरकारचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे जवळपास निम्मी लोकसंख्या शहरात राहते तिथे या प्रकल्पाचे मोल अधिक आहे. अर्थात या करिता सार्वजनिक आरोग्य सुविधा हा स्मार्ट सिटी संकल्पनेचा एक गाभाभूत घटक असणे,आवश्यक आहे. त्याची स्पष्टता अजून व्हावयाची आहे. देशातील कुपोषणासंदर्भात मिशन मोड मध्ये काम करण्यासाठी एका नव्या कार्यक्रमाची घोषणा ही या अर्थसंकल्पाची जमेची बाजू होय. अनेकवेळा आरोग्याकरिता तरतूद करणे म्हणजे केवळ नवनवीन मेडीकल कॉलेज काढणे,एम्स सारख्या संस्था काढणे या पलिकडे नियोजकांचा विचार जात नाही पण या अर्थसंकल्पात ४ एम्स सारख्या संस्था आणि १२ वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबरोबरच प्राथमिक आरोग्य सेवा संदर्भात काही महत्वपूर्ण तरतुदी या अर्थसंकल्पात केल्या आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१९ पर्यंत प्रत्येक घराला शौचालय सुविधा पुरविणे ही योजना सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. जलजन्य आजार,इतर साथरोग, आरोग्य संवर्धन अशा अनेक बाबींवर याचा विधायक परिणाम होणार आहे. २०२२ पर्यंत सर्वांना घर ही योजना देखील अशीच आरोग्य बाह्य वाटली तरी ती सार्वजनिक आरोग्याचीच योजना आहे,असे म्हणणे वावगे ठरु नये. पाण्याचे रासायनिक प्रदुषण दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूद तसेच मुलींच्या शाळेत पिण्याचे पाणी व शौचालयाची व्यवस्था या साठी केलेली तरतूद विशेष उल्लेखनीय आहेत. मासिक पाळी सुरु झालेल्या मुलींसाठी शाळेत स्वच्छ शौचालय असणे,हे त्यांना या वयात आवश्यक असणा-या प्रायवसी साठी गरजेचे आहे. वयात येणा-या मुलींसाठी शाळांमध्ये शौचालयाची व्यवस्था नसणे हे अनेकवेळा त्यांच्या शाळा सोडण्याचे कारण असू शकते,हे अनेक अभ्यासातून पुढे आले आहे.त्यामुळे अर्थसंकल्पातील या तरतुदीला आरोग्यासोबतच स्त्री शिक्षणाचे एक सामाजिक अंगही आहे, लक्षात घ्यायला हवे. बेटी बचाओ,बेटी पढाओया योजनेचेही याच भूमिकेतून स्वागत व्हायला हवे. मला चॉकलेट शेअर करायला आवडत नाही पण २०१४ च्या अर्थसंकल्पानंतर मात्र मला सिगारेट शेअर करणे आवडणार नाही,” असे ओमर अब्दुल्लांनी विनोदाने म्हटले असले तरी तंबाखूजन्य उत्पादनावरील करवाढ ही सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मोठी उपलब्धी म्हटली पाहिजे.
      मोठ्या शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून मेट्रो रेल्वेची कल्पना मांडली गेली पण या अनुषंगाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करताना ऍटोमोबाईल धोरणात आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. रस्त्यावरील कार आणि स्वयंचलित दुचाकींची संख्या कमी व्हावी आणि त्यातून पर्यावरणावरील विघातक परिणामांना आळा घालता यावा,यासाठी ऍटोमोबाईल इंडस्ट्रीला चालना देण्याच्या आपल्या धोरणाचा आपल्याला पुनर्विचार करावा लागेल.शेतीपेक्षा कारसाठीची कर्ज सहज उपलब्ध असणे,आपल्याला कसे परवडू शकते? आपल्या कार्बनच्या पाऊलखुणा कमी करण्यासाठी धाडसी निर्णय अपेक्षित आहेत. जैवइंधनासाठी कोळशावरील टॅक्स वाढविणे,हा एक उपाय झाला आपल्याला त्या पुढे जावे लागेल.
    आरोग्यासाठी हे सारे असूनही हा अर्थसंकल्प सार्वजनिक आरोग्याला काही नवी दिशा देतो,असे म्हणता येणार नाही. अर्थमंत्री हेल्थ फॉर ऑल ची घोषणा करतात पण ती इतकी वरवरची आहे की सर्वांसाठी आरोग्याच्या गावाला जाण्याच्या रस्त्याचे दिशा निर्देशन ते करत नाहीत. सर्वांना मोफत औषधे आणि निदान व्यवस्था देण्याची ते घोषणा करतात पण त्यासाठी नव्याने उभा करण्यात येणा-या वरिष्ठ नागरिकांसाठीच्या राष्ट्रीय संस्थांचा उल्लेख करतात तेव्हा ही हेल्थ फॉर ऑलची घोषणा तरी ती अर्धवट शिजलेली आहे,याची कल्पना येते. थायलंड, ब्राझील आणि मेक्सिको सारखे आपल्याच किंवा आपल्यापेक्षा कमकुवत आर्थिक प्रकृती असणारे देश युनिव्हर्सल हेल्थ कवरेजची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात यशस्वी होत असताना आपण मात्र अजूनही या संकल्पनेकडे पुरेशा गांभीर्याने पाह्यला तयार नाही. आरोग्यासाठी पुरेशा निधी,आरोग्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, सार्वजनिक आरोग्य योजनातील लोकसहभाग, औषधांची सहज व स्वस्त उपलब्धता,लसीकरण तंत्रज्ञान आणि सार्वजनिक आरोग्याचे प्रभावी व्यवस्थापन –संस्थात्मक सुधारणा या कळीच्या मुद्द्यांबाबत अळीमिळी गुपचिळी घालून आपण सारे आरोग्याच्या गावाला कसे पोहचणार,हा प्रश्न या अर्थसंकल्पाने अधिक गडद होत जातो. श्रीनाथ रेड्डी समितीचा अहवाल या संदर्भात मार्गदर्शक ठरावा.
   युनिव्हर्सल हेल्थ कवरेज सारख्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यात येणा-या अडथळ्यात सरकार इतकेच आपण सारे जबाबदार आहोत. १९७३ मध्ये मिलिटरी सरकारच्या जोखडातून मुक्त झालेला आणि तरीही सातत्याने राजकीय अस्थैर्याचा सामना करणारा इवलासा थायलंड हे करुन दाखवू शकतो कारण तिथे हा प्रश्न राजकीय अजेंड्यावरील विषय झाला. २००१ च्या सार्वत्रिक निवडणूकीत तिथल्या लोकांनी युनिव्हर्सल हेल्थ कवरेज ची मागणी लावून धरली. देशाची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही थाई राक थाई या पक्षाने ही मागणी आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट केली आणि याच प्रमुख मुद्द्यावर निवडणूकही जिंकली आणि सरकारी तिजोरीत पैसे अपुरे असतानाही,आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ युनिव्हर्सल हेल्थ कवरेज संकल्पना राबविणे शक्य नाही,असे सांगत असतानाही त्यांनी ही योजना प्रभावी व्यवस्थापन, कल्पकता,लोकसहभाग आणि राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण केली. आपल्यालाही राजकीय अजेंड्यावर युनिव्हर्सल हेल्थ कवरेज चा मुद्दा येण्यासाठी जनमताचा रेटा निर्माण करावा लागेल अन्यथा फ्लाय ओवर्स, मेट्रो आणि बुलेट ट्रेनच्या झंझावातात आपण आपले आरोग्य मात्र हरवून बसू...!
  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे,”हा अर्थसंकल्प संजीवक आणि नवा अरुणोद्य दाखविणारा आहे.” सार्वजनिक आरोग्याचे आभाळ मात्र या संजीवक अरुणोदयाच्या प्रतिक्षेत आहे. नव्या सरकारला थोडा वेळ  तर द्यायलाच हवा आणि आरोग्याचे अच्छे दिन कधी येतील याची पावसाप्रमाणेच संयमाने वाटही पाह्यला हवी.

( लोकप्रभा -25 जुलै 2014 )