Tuesday, 14 April 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धम्म

 एक अस्पृश्य हिंदू म्हणून मी दुर्दैवाने जन्माला आलो. मी कोणत्या जातीत जन्माला यावे, हे काही माझ्या हाती नव्हते मात्र मला माणूस म्हणून अपमानित करणारी ही जात, हा धर्म मी फेकून देऊ शकतो आणि माझ्या परिस्थितीत सुधारणा करू शकतो आणि मी असं करू शकतो, याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही .मी तुम्हा सगळ्यांसमोर स्पष्टपणे सांगतो, मी स्वतःला हिंदू म्हणवून घेणारा माणूस म्हणून मरणार नाही,"

दिनांक १३ ऑक्टोबर १९३५  येवला जिल्हा नाशिक येथे आपल्या चाहत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलत होते.  धर्मांतराबद्दलची घोषणा इतक्या सुस्पष्टपणे बाबासाहेब प्रथमच करत होते. ती रात्रीची वेळ होती आणि प्रत्यक्षात धर्मांतराचा तो क्रांतिकारी पहाटक्षण यायला अजून २१ वर्षांचा अवधी होता.



महात्मा गांधींसह अनेकांना बाबासाहेबांची ही घोषणा आश्चर्यकारक वाटली.नुकत्याच ऑगस्ट  १९३५  मध्ये गुजरात मधील आणंद जिल्ह्यातील एका गावात अस्पृश्य लोक आपली मुले शाळेत पाठवतात याचा राग येऊन तेथील गावकऱ्यांनी अस्पृश्य मंडळींवर सामाजिक बहिष्कार टाकला होता. त्यांना रोजंदारीची कामे देणे बंद केले. त्यांच्या पाणी पिण्याच्या विहिरीत केरोसीन टाकले. या त्रासाने नमून अखेरीस, ‘आम्ही आमची मुले शाळेत पाठवणार नाही,’ असे या अस्पृश्यांना   नाईलाजाने लिहून द्याव लागले. बाबासाहेबांची येवल्यातील घोषणा ही या घटनेच्या रागातून आणि भावनेच्या भरात केलेली घोषणा आहे, असे गांधीसह अनेकांना वाटले; परंतु बाबासाहेब भावनेच्या भरात एवढा मोठा सामाजिक निर्णय घेणारी व्यक्ती नव्हते. या साध्या वाक्यापाठीमागे त्यांचे, त्याच्या समाजाचे शेकडो वर्षांचे जगणे आणि त्यांचा स्वतःचा अवघा वैचारिक प्रवास दडलेला होता. बाबासाहेबांच्या या विलक्षण क्रांतिकारी घोषणे मागे कोणतेही तत्कालीन कारण नव्हते.

"आमुची केली हीन याती । तुज कां न कळे श्रीपती ॥१॥

जन्म गेला उष्टे खातां । लाज न ये तुमचे चित्ता ॥२॥

आमचे घरीं भात दहीं । खावोनी कैसा म्हणसी नाहीं ॥३॥

म्हणे चोखियाचा कर्ममेळा ।कासया जन्म दिला मला ॥४॥"

असा रोखठोक प्रश्न १४  व्या शतकात साक्षात विठोबाला विचारणारा कर्ममेळा हा त्यांचा पूर्वसुरी होता. अस्पृश्य जातीत जन्मलेल्या प्रत्येकाच्या तळहातावर हा प्रश्न जणू कोरलेला होता. बाबासाहेबांचे अवघे आयुष्य हा या प्रश्नाचा पाठलाग आणि त्याची सोडवणूक होती, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

आणंद या जिल्ह्यातील अस्पृश्य समाजावरील  अन्यायाची घटना बाबासाहेबांनी स्वतः अनुभवलेल्या अनेक घटनांपैकी एक होती. जन्मल्यापासून ते परदेशातून उच्च शिक्षण घेऊन परतल्यानंतरही बडोदा संस्था, सिडेनहेम कॉलेज आणि इतरत्रही त्यांनी स्वतः अस्पृश्यतेचे चटके सोसले होते. वेटिंग फॉर अ व्हिसा’, या आपल्या १९३५  च्या पुस्तकात त्यांनी यासंदर्भातील सहा आठवणी लिहिल्या आहेत . जातीय विषमतेने भारतीय हिंदू समाज हा किती पोखरलेला आहे, हे ते हरघडी, हरदिवशी पहात होते, अनुभवत होते. साताऱ्यात खंडीभर न्हावी असताना देखील आपणा सर्व भावंडांचे केस आपल्या थोरल्या बहिणीलाच का कापावे लागतात, हा बालभीमाला पडलेला प्रश्न आता भीमकाय होऊन परदेशी शिक्षण घेऊन आलेल्या विद्वान बाबासाहेबांना  पडला होता आणि त्याचे विश्लेषण एक समाजशास्त्रज्ञ म्हणून बाबासाहेब करत होते.

बाबासाहेबांच्या मते, जातीय विषमतेने भारतीय समाजाचे केलेले नुकसान दुहेरी आहे. या विखारी विषमतेमुळे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्या आणि हीन मानल्या घेणाऱ्या गेलेल्या दोन्हीही जातीय गटांमध्ये कोणतेही नैतिक बळ आणि क्षमता उरलेली नाही या विषमतेमुळे शूद्र-अतिशूद्र जाती-जमातींमध्ये हीनतेची, अपमानाची भावना निर्माण झालेली आहे तर उच्च वर्णीयांमध्ये  नाहक बडेजाव तसेच खुनशीपणाची भावना निर्माण झालेली आहे. या व्यवस्थेमुळे कोणत्याच सामाजिक स्तराकडून आपल्याला उत्तुंग आणि उत्कृष्ट कार्य होताना दिसत नाही कारण चांगले पीक येण्यासाठी जमीन देखील तेवढीच कसदार असावी लागते, परंतु हिंदू धर्मातील विषमतामूलक वातावरणामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि इतर देशांच्या तुलनेत आपण येथील समाजाला कित्येक शतके मागे नेऊन ठेवले आहे. फ्रान्समध्ये एका चांभाराचा मुलगा असलेला नेपोलियन सत्तास्थानी विराजमान होऊ शकतो, ब्रिटनमध्ये ज्याच्या आई-वडिलांचा पत्ता नाही असा रॅमसे मॅकडोनाल्ड सारखा मनुष्य पंतप्रधान होतो. युरोपमध्ये स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहेत  पण भारतामध्ये मात्र स्त्री शूद्र अतिशूद्रांना आजही साधेहे पवित्र अक्षर उच्चारण्याचे देखील स्वातंत्र्य नाही.

हिंदू समाजातील जातीय विषमतेबद्दलचे इतके मूलगामी निरीक्षण नोंदवूनही बाबासाहेब लगोलग धर्मांतराची गोष्ट करत नाहीत. आपण जर बाबासाहेबांचा वैचारिक प्रवास नीट समजून घेतला तर आपल्या लक्षात येते की, धर्मांतरासंदर्भातील बाबासाहेबांचा निर्णय हा अचानक घेतलेला निर्णय नाही. तो हळूहळू उत्क्रांत होत गेलेला निर्णय आहे. १ फेब्रुवारी १९२९ रोजी बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमध्ये लिहिले होते की," धर्मांतर हा काही अस्पृश्यतेवरील तोडगा नाही. व्यक्तिगत पातळीवर तो तोडगा असू शकतो पण सर्व अस्पृश्यांसाठी मात्र तो मार्ग योग्य असेल, असे नाही. आपण ही ब्राह्मणी धार्मिक व्यवस्था मुळापासून नष्ट करू इच्छितो," असं सांगून बाबासाहेब म्हणतात की," खरा पुरुषार्थ हा खुल्या मैदानात अस्पृश्यतेशी दोन हात करण्यात आहे, तिच्यापासून दूर पळून जाण्यात नाही." याचा अर्थ बाबांसाहेबांची सुरुवातीची भूमिका ही हिंदू समाजासुधारणेची होती, हे स्पष्ट होते.

अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना जॉन ड्युई हे बाबासाहेबांचे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. जॉन ड्युई यांचा वैचारिक प्रभाव बाबासाहेबांवर निश्चितपणे जाणवतो. त्यांचे 'डेमोक्रसी अँड एज्युकेशन 'हे बाबासाहेबांचे एक आवडते पुस्तक. आदर्श समाजातील सहमतीपूर्ण जीवनाची 'असोसिएटेड लिविंग' ची संकल्पना आपल्या पुस्तकात ड्युई यांनी मांडली आहे. आपण त्याला आदर्श सामुदायिक जीवन असे देखील म्हणू शकतो. जॉन ड्युई  यांच्या मते आदर्श समाजात वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लोक गुण्यागोविंदाने नांदतात त्याचं कारण हे असोसिएटेड लिविंग.  या समाजात वेगवेगळ्या सामाजिक घटकांमधील सुसंवादासाठी अनेक प्लॅटफॉर्म, अनेक खिडक्या उपलब्ध असतात. ज्या समाजामध्ये लोकशाही खऱ्या अर्थाने रुजलेली असते त्याच समाजामध्ये हे खरेखुरे सामुदायिक जीवन आपण अनुभवू शकतो. मात्र ज्या समाजामध्ये वर्ग आणि जातींमध्ये समाज विभागलेला असतो आणि एखाद्या  विशिष्ट वर्ग अथवा जातीकडे सत्ता केंद्रित झालेली असते तेव्हा हा वर्ग किंवा जात समाजातील इतर घटकाचे शोषण करत राहतो. अशा समाजात हे आदर्श सामुदायिक जीवन अभावानेच आढळते. जॉन ड्युई यांची असोसिएटेड लिव्हिंगची ही कल्पना बाबासाहेबांनी आपल्या लिखाणामध्ये अनेकदा उधृत केलेली आढळते. अर्थात बाबासाहेबांनी अनेक पाश्चात्य आणि भारतीय लेखकांचे साहित्य वाचलेले असले तरी त्यांनीच म्हटल्याप्रमाणे यातील कोणताही लेखक हा त्यांचा हिरो नव्हता. याबाबतीत बाबासाहेब अत्यंत चोखंदळ आणि निवडक होते. जे योग्य आहे,समाजहिताचे आहे, तेच निवडून स्वतःच्या विचाराशी जोडून घेणे, ही बाबासाहेबांची खासियत!  कुणी कितीही थोर महान असले तरी बाबासाहेबांनी त्याचे अंधानुकरण केले नाही. त्यातील निवडक भाग वेचून,तो स्वतःच्या व्यक्तिमत्वात मुरवून त्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सहजभाव करणे, हे बाबासाहेबांचे वैशिष्ट्य आपल्याला अनेक ठिकाणी दिसते. बाबासाहेबांच्या संपूर्ण चरित्राचे अवलोकन करत असताना आपल्याला हे जागोजागी जाणवते की त्यांनी भारतीय समाजाचे रूपांतर एका आदर्श समाजात करण्यासाठी वेगवेगळ्या जातसमूहामध्ये संवादाचे नवनवे प्लॅटफॉर्म्स, खिडक्या कशा तयार करता येतील याचा विचार त्यांनी सदोदित केला. समाजात माणूसकी कशी नांदेल आणि  माणूस म्हणून प्रत्येक व्यक्ती अधिक कशी होईल, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. महाडचा सत्याग्रह किंवा विविध ठिकाणी झालेले मंदिर प्रवेशाचे सत्याग्रह या चळवळीतील विविध घटना हा एका अर्थाने हिंदू समाजाला खडबडून जागे करण्याचा अत्यंत तळमळीने केलेला प्रयत्न होता. दुर्दैवाने हे प्रयत्न समाजात फार दूरपर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि लोकशाही मूल्यांवर आधारित असलेला समाज निर्माण करण्याच्या बाबासाहेबांच्या प्रयत्नात इथल्या सनातनी समाजाने वारंवार अडचणी आणल्या.

हिंदू समाजात राहून जेव्हा लोकशाही पूरक अशा आदर्श समाजाची निर्मिती करण्याचे प्रयत्न विल होतात तेव्हा बाबासाहेब धर्मांतराच्या पर्यायाकडे गांभीर्याने पाहू लागतात कारण मुळात समाजासाठी धर्माची आवश्यकता आहे हे त्यांना मान्य आहे. धर्म आणि धर्माच्या सामाजिक प्रभावाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे एखाद्या विद्युत प्रवाह वाहत असलेल्या जिवंत तारेकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे, असा इशारा ते देतात आणि कार्ल मार्क्सप्रमाणे धर्माकडे नकारात्मक दृष्टीने पहात नाहीत.

"यतो अभ्युदय निश्रेय सिद्धिः स धर्मः" हे महर्षी कणादांच्या वैशेषिक दर्शनातील एक पायाभूत संस्कृत सूत्र आहे . यानुसार धर्म म्हणजे अशी गोष्ट आहे जी ऐहिक समृद्धी/प्रगती (अभ्युदय) आणि सर्वोच्च आध्यात्मिक मुक्ती किंवा अंतिम कल्याण (निश्रेय) या दोन्हींकडे घेऊन जाते, जे एक सुसंवादी, संतुलित जीवन अधोरेखित करते. आंबेडकर या विधानाचा उल्लेख करून असं म्हणतात की, हे सगळे तत्त्वज्ञान जर व्यवहारांमध्ये आणायचे नसेल तर ते काय फक्त चाटायचे आहे काय?

समाजाला एकसंघ ठेवण्यासाठी त्याला एकतर कायद्याची मान्यता हवी असते किंवा नैतिकतेची. या दोन्ही शिवाय समाज अनेक तुकड्यांमध्ये विभाजित होऊ शकतो सर्वच समाजांमध्ये कायदा याबाबतीत खूप छोटी भूमिका बजावतो, केवळ मूठभर लोकांना सामाजिक शिस्तीच्या परिघांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो पण बहुसंख्य त्यातून सुटून जातात. या बहुसंख्य लोकांनाही सामाजिक शिस्तीच्या परिघांमध्ये आणायचे असेल तर नैतिकतेची एक चौकट, एक अधिमान्यता गरजेची असते, धर्म ही ती नैतिकतेची जाणीव आहे आणि म्हणून समाज धारणा करणारे ते एक महत्त्वाचे तत्व आहे.

समाजासाठी धर्म आवश्यक आहे, असे सांगताना बाबासाहेबांनी हा धर्म कसा असला पाहिजे याबाबतही विवेचन केले आहे  आधुनिक काळातील धर्माने तीन परीक्षा उत्तीर्ण झाल्या  पाहिजेत, असा बाबासाहेबांचा आग्रह आहे. यातील पहिली परीक्षा म्हणजे हा धर्म विज्ञानाची कास धरणारा असायला हवा, दुसरी परीक्षा या धर्माने घालून दिलेले नीतीनियम हे स्वातंत्र्य, समता आणि सहभाव या तीन मूलभूत मानवी तत्वांशी  मेळ राखणारे, त्यांची जाणीव ठेवणारे हवेत आणि तिसरी महत्त्वाची चाचणी म्हणजे या धर्माने दारिद्र्याचे गौरवीकरण करता कामा नये. बाबासाहेबांना या तीनही चाचण्या उत्तीर्ण करण्याची क्षमता गौतम बुद्धाच्या धर्मामध्ये दिसून येते कारण बुद्ध स्वतःला परमेश्वर समजत नाही, तो ईश्वरावर विश्वासही ठेवत नाही, त्याचा धर्म हा विवेक, तर्क आणि अनुभवावर आधारित आहे आणि तो स्वतः विषमतामूलक अशा चातुर्वर्ण विरोधी  आहे. गौतम बुद्धाने  दारिद्र्याचे नाहक कौतुक केलेले नाही. ही सगळी पृथ्वी आपलीच आहे आणि आपणच तिचे मालक आहोत, असे गोडवे त्यांनी गायले नाहीत उलटपक्षी त्यांनी श्रीमंतीचे, समृद्धीचे स्वागत केले. त्यांचा मुद्दा आहे तो एवढाच की,ही श्रीमंती, ही समृद्धी विनयशासित म्हणजेच नैतिक नियमांनी साध्य केलेली असावी. तुकारामांच्या भाषेत ‘ जोडोनीया धन उत्तम व्यवहारे..’ हेच बुद्धाचे सांगणे आहे. बौद्ध धम्म ‘ कारणाविना काहीही घडत  नाही , हे खुलेपणाने सांगण्याइतका इतका निखळ विज्ञानवादी आहे. तसेच तो समतावादी आहे. बाबासाहेबांच्या तिन्ही परीक्षा हा धम्म उत्तीर्ण होतो.

ब्राह्मणी धर्म आणि लोकशाही या परस्परविरोधी बाबी आहेत,  आपल्याला लोकशाही हवी असेल तर चातुर्वर्ण नाहीसा झाला पाहिजे. आज हिंदू समाजाची अवस्था अत्यंत दुबळी अशी आहे. पोटाचा नगारा झालेल्या, हाडाच्या काड्या झालेल्या, गालफाड बसलेल्या, डोळे खोल गेलेल्या अशा एखाद्या व्यक्तीसारखी या समाजाची स्थिती आहे. अशा समाजामध्ये लोकशाहीचा गाडा हाकण्याची इच्छा असू शकते पण शक्ती अजिबात नाही. ही शक्ती मिळवण्यासाठी या समाजाला ब्राह्मणी धर्माच्या चिखलातून शेकडो वर्षांपासून रुतलेला आपला गाडा बाहेर काढावा लागेल. गौतम बुद्ध हा एकमेव डॉक्टर आहे, जो या रोग्याला बरे  करू शकतो. गौतम बुद्धाचे स्मरण आणि त्यांनी दिलेली औषध घेणे हाच भारतामध्ये लोकशाही रुजवण्याचा एकमेव मार्ग आहे, या विचारांपर्यंत बाबासाहेब आपल्या अभ्यासातून येतात, हे त्यांचा वैचारिक प्रवास स्पष्ट करतो. अगदी शाळकरी वयांपासून गौतम बुद्ध बाबसाहेबांचा सांगाती राहिलेला आहे. बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महार समाजाने त्यांचा सत्कार करायचे ठरवले तेव्हा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी पोर वयातील  बाबासाहेबांच्या हाती त्यांचे गौतम बुद्धाचे चरित्र हे पुस्तक भेट म्हणून सोपविले. बुद्धाची आणि बाबासाहेबांची ही पहिली भेट होती. या पुस्तकाचा परिणाम असा झाला की, बाबासाहेबांनी आपल्या घरातच वडिलांना मूर्तीपूजा, रामायण महाभारत या संदर्भात अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि वडिलांनी यापूर्वी आपल्याला गौतम बुद्धा संदर्भातील साहित्य वाचायला का दिले नाही, असा प्रश्न त्यांनी केला. शाळकरी वयातील हे छोटे बंडच बाबासाहेबांना १९५६ मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत घेऊन गेले.

 


बाबासाहेबांना जो सामाजिक बदल हवा आहे तो त्यांना वरवरचा नको आहे, त्यांना कायम स्वरूपी , दीर्घकालीन बदल अपेक्षित आहे. तो हिंसक क्रांतीतून येणार नाही, याची त्यांना खात्री आहे. सामाजिक बदलासाठी बाबासाहेबांचा विश्वास हा क्रांतिकारी मार्गापेक्षा देखील अधिक संविधानिक मार्गावर होता. एडमंड बर्क याने फ्रेंच क्रांतीवर केलेली टीका उदृत करून बाबासाहेब म्हणतात, क्रांतिकारी मार्गाची अंतिम निष्पत्ती अनेकदा अनिश्चित स्वरूपाची असते. अनेकदा या पद्धतीच्या क्रांतीमधून गोंधळ आणि आपत्तीची अवस्था निर्माण होते. क्रांती केवळ एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे सत्ता हस्तांतरित करते परंतु अस्पृश्य आणि वंचित समूहाला केवळ सत्तेचे हस्तांतरण नको आहे तर त्यांना समाजामध्ये सत्तेचे समान वाटप करणारा सकारात्मक बदल हवा आहे आणि हा बदल हा केवळ संविधानिक मार्गानेच येऊ शकतो. आणि केवळ राजकीय सत्तेमध्ये वाटा मिळाल्याने वंचित समूहाच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक होऊ शकत नाही, त्यांच्या सामाजिक उन्नयनातच खऱ्या अर्थाने त्यांच्या मुक्तीचा मार्ग दडला आहे.

बाबासाहेबांनी अनेक धर्मांचा अभ्यास करून अस्पृश्य आणि वंचित जातींसाठी अखेरीस बौद्ध धम्माची निवड केली. या पाठीमागे बाबासाहेबांची निश्चित अशी वैचारिक भूमिका होती. बाबासाहेबांना या वंचित समूहासाठी धर्म तर हवा होताच पण असा धर्म जो घटनात्मक मूल्यांची मेळ राखेल. तो कुठेही घटनात्मक मूल्यांच्या विरोधी जाणार नाही. ही शक्यता त्यांना गौतम बुद्धाच्या शिकवणुकीमध्ये अधिक प्रमाणात दिसली आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धम्माचा मार्ग स्वीकारला.

माणसाला दुःखाच्या पलीकडे नेणारा हा धर्म खरे म्हणजे विज्ञानाची पहाट आहे. तो प्रतीत्य समुत्पाद या तार्किक मूल्यांवर आधारलेला आहे. एखाद्या वैज्ञानिकाला एखादा शोध लागावा तसा तो गवसला आहे. गौतम बुद्धाची आणखी एक खासियत म्हणजे तो स्वतःच्या चिकित्सेला खुली परवानगी देतो. मी उच्चारलेला शब्द हा अंतिम आहे, असे तो मानत नाही. म्हणजेच गौतम बुद्ध शब्दप्रामाण्य नाकारतो, तो त्याने स्वतः सांगितलेला धम्मदेखील कालानुरूप सुसंगत करण्यासाठी त्यातील बदल ग्राह्य मानतो आणि म्हणूनच बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारताना धम्माच्या मूळ तत्त्वज्ञानाचा कालसुसंगत असा अर्थ पुढे ठेवला.  हीनयान आणि महायान हे दोन पंथ बाबासाहेबांपूर्वी बौद्ध धम्मात होतेच; परंतु बाबासाहेबांनी जो धम्म स्वीकारला त्याला म्हणूनच नवयान असे म्हणतात. बाबासाहेबांनी सर्वप्रथम बुद्धाचा गृहत्याग आणि त्या संदर्भातील कथा, मिथके यांच्या पलीकडे जाऊन त्याच्या गृहत्यागाचे कारण हे शेजारील राज्याशी पाणी विषयक झालेल्या तंट्यातून कसे निर्माण झाले, हे स्पष्ट केले आहे. बुद्धाच्या पारंपारिक चरित्रापेक्षा हा भाग वेगळा आहे. बुद्ध ज्या दुःखाची गोष्ट करतो ते दुःख हे भौतिक दुःख आहे आणि त्याची कारणे सामाजिक आहेत, हे बुद्धाच्या वेगवेगळ्या शिकवणुकीतील बाबींचा आधार घेत बाबासाहेब स्पष्ट करतात. बुद्धाने पुन्हा पुन्हा वापरलेल्या कर्म या शब्दाचाही अत्यंत व्यावहारिक असा अर्थ बाबासाहेब लावतात.  गत जन्मीचे कर्म, पुनर्जन्म या बाबी बाबासाहेब नाकारतात.त्याचबरोबर बुद्धाच्या भिक्खू संघातील भिक्खूंच्या भूमिकेबद्दलही बाबासाहेब परिवर्तनशील भूमिका मांडतात. हे भिक्खू म्हणजे समाजामध्ये मिसळून समाजातील दोष दूर करणारे परिवर्तनशील दूत आहेत, ही बाबासाहेबांची भिक्खू संघाबद्दलची भावना आहे. गौतम बुद्धाला अपेक्षित असणारे सामाजिक परिवर्तन प्रत्यक्षात आणण्यासाठी बौद्ध भिक्खूंनी कार्यरत असले पाहिजे. त्यांनी धम्म कर्मकांड, पूजाअर्चा यामध्ये बांधून ठेवता कामा नये, हे बाबासाहेब सुस्पष्टपणे विशद करतात.

माणसाचे माणसासोबत असलेले नाते आणि माणसाचे पृथ्वीवरील जीवन हेच बौद्ध धम्माचे केंद्रीय आणि मूलभूत तत्व आहे, हे बाबासाहेब पुन्हा पुन्हा अधोरेखित करतात. मनुष्याचे दुःख, वेदना, दारिद्र्य यासाठी बुद्धाने दिलेला प्रज्ञा, शील, मैत्र आणि करुणा यांचा मार्ग हा व्यावहारिक मार्ग आहे, हे आपण सर्वांनी समजावून घ्यायला हवे.

बाबासाहेबांनी दाखवलेल्या या बुद्धाच्या वाटेने जाण्यासाठी ‘धम्मधारा’ या माझ्या काव्यग्रंथात मी लिहिले आहे,

'तथागत पाहू, तथागत गाऊ

तथागत मार्गे, बोधिसत्व होऊ

मार्ग मित्रतेचा, मार्ग करुणेचा

बुद्ध दावी बघ, मार्ग माणसाचा! '

मित्रतेचा आणि करुणेचा हात हातात घेऊन माणसांच्या मार्गाने चालत जाणे हाच हीच बाबासाहेबांच्या स्मृतीला खरीखुरी आदरांजली आहे आणि हेच त्यांच्या लाडक्या तथागत गौतम बुद्धाचे स्मरण आहे हे आपण सर्वांनी ध्यानी ठेवले पाहिजे.


- प्रदीप आवटे

Saturday, 24 May 2025

डॉक्टर, कविता वाचत जा रे अधूनमधून...


प्रदीप आवटे,

पुणे.

दिनांक – २७ जून २०२४

 

प्रिय डॉ. राजेंद्र,

तुला मी लिहित असलेलं कदाचित हे पहिलं पत्र असेल. अलिकडील काळात तर मोबाईल, व्हॉटस अप यामुळे  बोलणे सोपे झाले आहे. पत्राची मुळी गरजच पडत नाही. पण पत्र ही खूप सुंदर गोष्ट होती. तसं पाह्यलं तर आताही मी तुला टाईप करुन लिहतो आहे, पत्र तर आपण कागदावर छानपैकी पेनने वगैरे लिहायचो. त्या पत्राला लोक अर्धी भेट म्हणायचे. चलो , जाने दो..उगीच जुन्या गोष्टी उगाळण्यात अर्थ नाही. गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा.. हेच खरे.

अलिकडे माझा डावा गुडघा चालताना अधूनमधून दुखतो तेव्हा अगदी तीव्रतेने तुझी आठवण येते. वाढत्या वयासोबत हाडाच्या डॉक्टरची आठवण प्रत्येक कळेसोबत येत राहते. म्हणून तर  ‘काय हवे ते माग’, असे कृष्णाने म्हटल्यावर कुंती कृष्णाला म्हणाली ना, ‘ देवा, मला दुःख दे.” दुःख, वेदना माणसाला जोडणारी गोष्ट असते. तुझा मला खरोखरच मनापासून अभिमान वाटतो. एका साध्यासुध्या घरात जन्मलेल्या आणि कोणतीच पार्श्वभूमी नसलेल्या तू कुठल्या कुठं भरारी मारली आहेस. आजही हायवेवरुन येता जाता तुझे हॉस्पिटल पाहताना मन एका विलक्षण आनंदाने भरुन येते. हॅटस ऑफ टू यू.

पण आज एका वेगळयाच कारणाने तुला लिहायला बसलो आहे. आज सकाळी ९ च्या आसपास तू ‘आपली माणसं’ या आपल्या ग्रुपवर एक फॉरवर्डेड मेसेज पाठवलास. खरं म्हणजे आज सकाळपासून मी पब्लिक हेल्थ इमर्जंसी ॲन्ड डिझास्टर मॅनेजमेंट या सीडीसी वर्कशॉपमध्ये बिझी आहे. पण तो तुझा मेसेज वाचल्यापासून माझे कशात लक्षच लागेना. मी बराच अस्वस्थ झालो. थोडा वेळ काढला आणि तुला लिहायला बसलो.

तुझी आणि माझी राजकीय मते वेगळी आहेत. आणि त्यात काहीच हरकत नाही. प्रत्येकाला आपापली राजकीय मते असतात. त्यात वावगे काहीच नाही. पण आजच्या तुझ्या मेसेजमध्ये केवळ राजकीय मते नव्हती. आणखी काही तरी गंभीर होते. मला एक माणूस म्हणून , एक डॉक्टर म्हणून काळजी वाटली. एका पत्रकाराची ही पोस्ट आहे. त्यात हिंदू व्यक्तींनी अवयव दान करताना आपला अवयव केवळ हिंदूनाच मिळावेत अशी अट घातली पाहिजे, असे म्हटले आहे. का तर, मुस्लिम व्यक्ती अवयवदान करत नाहीत केवळ अवयव घेतात , असे या पत्रकार महोदयांनी म्हटले आहे. असा मेसेज तू फॉरवर्ड केला आहे, हे पाहून मला धक्का बसला.

 हा पत्रकार कोण , ते जे बोलतात ते खरे की खोटे हे नंतर पाहू पण अवयवदान करणा-या हिंदूंनी आपले अवयव केवळ माझ्या धर्माच्याच माणसाला मिळावेत , अशी अट घालणे तुला डॉक्टर म्हणून योग्य वाटते ? केवळ हिंदू दुकानदारांकडूनच खरेदी करा, मुसलमान दुकानदारांकडून खरेदी करु नका, हे आजवर ऐकले होते पण हे त्याहून गंभीर आहे. ‘ म्हाद्याचं रक्त ममद्याला, रक्त लागतं समद्याला,’ अशी घोषणा देत मी कोर्टी परिसरात किती तरी रक्तदान शिबिरे घेतली आहेत. उद्या हिंदूने आपले रक्त हिंदूनाच द्यावे असेही आपण म्हणायला लागू की काय असे वाटले क्षणभर.  

मला आतून भ्यायला झाले.

आपण डॉक़्टर आहोत, राजेंद्र. आपलं नातं फक्त माणसाच्या दुःखाशी आहे, त्याच्या जातधर्माशी नाही. आपण हिपोक्रेटिक शपथ घेऊन डॉक्टरकीची पदवी घेतली आहे. आपल्यासाठी सगळी माणसं सारखी आहेत, असली पाहिजेत. जगात कुणी काहीही म्हणेल आपण माणूस जपला पाहिजे. कुणाचीही असो, वेदना, कळ, दुःख हलकं करणं एवढंच आपण शिकलो आहोत. आपण जर वेदना असलेला माणूस कोणत्या धर्माचा आहे हे पाहून त्याला उपचार देऊ लागलो तर आपल्या डॉक्टरकीचाच तो पराभव असेल. मे बी, तू फार विचार न करता , अगदी नेहमी प्रमाणे कॅज्युएली हा मेसेज पाठवला असशील पण तो मेसेज अत्यंत माणूसद्वेष्टा आहे. माणसाला माणसापासून दूर करणारा आहे. तुला इमिली डिकिंसनची कविता आठवते ना, जी कनिंगहॅमच्या पहिल्या पानावर छापली होती,

“If I can stop one heart from breaking,

I shall not live in vain;

If I can ease one life the aching,

Or cool one pain,

Or help one fainting robin

Unto his nest again,

I shall not live in vain.”

मला कधी कधी ही कविता तुझ्यामाझ्यासारख्या डॉक्टरांची छोटीशी प्रतिज्ञा वाटते.



आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे मुसलमान व्यक्ती अवयव दान करत नाहीत ही गोष्ट खरी आहे का ? ही पूर्णपणे खोटी गोष्ट आहे. किती तरी मुसलमान व्यक्तींनी अवयव दान केले आहे. अरे साधं, ‘ऑर्गन डोनेशन बाय मुस्लिम्स इन इंडिया’, असं गुगल जरी केलं तरी किती तरी घटना समोर येतील.

अगदी डिसेंबर २३ ची मुंबई मधील गोष्ट आहे, कल्याण मधील रफीक शाह आणि घाटकोपर मधील आयुर्वेद डॉक्टर राहुल यादव यांची ! रफीकला किडनी दिली राहुल यादव यांच्या आईने आणि राहुल यादव यांच्या पत्नीला गिरिजाला किडनी दिली रफीकच्या पत्नीने..! किडनीमुळे ही वेगवेगळया धर्माची कुटुंबे एकमेकांना जोडली गेली. अशीच एक घटना २०२१ मध्ये डेहराडून मध्ये घडली. मागच्या वर्षी अहमदाबाद येथे ईदला रुबेन शेख यांचा ९ वर्षाचा मुलगा अपघातात ब्रेन डेड झाला. कुटुंबाने त्याचे अवयवदान केले. अशी किती तरी उदाहरणे.

अरे, आता मुस्लिम सत्यशोधक समाज दरवर्षीची बकरीद रक्तदान, अवयव दान आणि देहदानाने साजरी करतो. अनेक शहरांमध्ये रक्तदान शिबिरे होतात, मी स्वतः तिथं रक्तदान केले आहे. अनेक जण अवयवदानाचा आणि देहदानाचा फॉर्म भरुन देतात. या वर्षीच्या बकरीदच्या किती तरी बातम्या तुला दिसतील.

मुस्लिम अवयवदान करतच नाहीत, ही बाब खोटी आहे, हे सिध्द करायला अजून काय काय सांगू सांग ना !

आता तुझ्या त्या पत्रकार व्यक्तीबद्दल.

आपण कुणाला फॉलो करतो, कुणाला कोट करतो, हे खरेच खूप महत्वाचे असते. जरा या पत्रकार महोदयांचा इतिहास तरी पहा. चक्क दारु पिवून रिपोर्टींग केले म्हणून आपली नोकरी गमावणारा, फेक न्यूज पसरवणारा ,बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा ( पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल झालेला माणूस आपण फॉलो तरी करावा का ?  आता अशा माणसाला आपण कसे काय कोट करु शकतो, सांग ना ?

आपण डॉक्टर असल्याने किती तरी साधी माणसं आपण जे सांगतो, बोलतो त्यावर विश्वास ठेवून इतरांनाही सांगतात. अशावेळी आपण काहीही बोलताना, मेसेज करताना काळजी घ्यायला हवी, असे मला वाटते.

मी खूप शहाणा आहे आणि मला सारे काही कळते, असे अजिबात नाही. चुकत चुकतच मी चालतो आहे.  फक्त तुझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा आहे आणि मला तुझ्याबद्दल खूप प्रेम आणि आपुलकी वाटते, म्हणून हे लिहिले. आपल्या जवळच्या माणसाने चुकू नये, असे वाटते ना, या भावनेने लिहिले हे सारे लिहिले आहे.  राग मानू नये, ही कळकळीची विनंती.

उद्या मी ही काही चुकलो तर तू ही इतक्याच सहजतेने मला नक्की सांगावेस. मला आवडेल ते, कारण आपलीच माणसे आपल्याला भलंबुरं काय ते सांगत असतात, आपल्याला सावरत असतात. 

पूर्वी कुठल्या कुठल्या कविता वाचायचास तू, साठवून ठेवायचास. अधेमधे कोट करत राहायचास. प्रॅक्टिसमध्ये पडलास आणि कवितेचे वेड कमी झाले की काय तुझे ? डॉक्टर, कविता वाचत जा रे अधूनमधून, बरं असतं प्रकृतीला. बीएमआय नॉर्मल राहतो. बेसिक माणूसपण इंडेक्स रे ...! कवितेसारखं दुसरं मेडिसीन नाही, जप स्वतःला.

आनंदी आणि बच्चे कंपनीला खूप सारे प्रेम.

 

तुझा,

प्रदीप आवटे.

 

Sunday, 13 April 2025

शाहू, फुले, आंबेडकर आठवताना…

 

आपण बोलताना महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा असे अगदी नेहमीच म्हणून जातो. या तिघांच्याही जीवनकार्यातील एक गोष्ट मला नेहमी ठळकपणे जाणवते. संस्थानिक असणा-या शाहू महाराजांनी त्या काळी त्यांच्या एकूण वार्षिक बजेटपैकी सुमारे २२ टक्के निधी हा शिक्षणासाठी खर्च केला. महात्मा फुले यांनी मुलींसाठीची पहिली शाळा तर काढलीच पण त्याशिवाय शूद्र अतिशूद्रांच्या शिक्षणासाठी त्यांनी आपली हयात खर्च केली. १८८२ साली शिक्षण विषयक काम करणा-या हंटर कमीशनला त्यांनी दिलेले निवेदन भारतातील शैक्षणिक इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. ‘ विद्येविना मती गेली,’ हे त्यांचे सुप्रसिध्द वचन मानवी जीवनातील उन्नतीसाठी शिक्षणाचे  सर्वांगीण महत्व विशद करते. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,’ हे बाबासाहेबांचे महत्वाचे वाक्य आपण सगळेच जण जाणतो. एके ठिकाणी तर त्यांनी म्हटले आहे , “The backward classes have come to realize that after all education is the greatest material benefit for which they can fight. We may forgo material benefits, we may forgo material benefits of civilization, but we cannot forgo our right and opportunities to reap the benefit of the highest education to the fullest extent. That is the importance of this question from the point of view of the backward classes who have just realized that without education their existence is not safe.” याचा अर्थ सर्व काही गमावले तरी चालेल पण मागास समाजाने गुणवत्तादायी अशा उच्च शिक्षणाचा आपला हक्क आणि संधी गमावता कामा नये. कारण चांगल्या शिक्षणाशिवाय त्यांचे अस्तित्व सुरक्षित नाही.



याचा अर्थ शिक्षण हा या तिन्ही महापुरुषांच्या विचारातील सामाईक दुवा आहे. आज फुले, शाहू आणि आंबेडकरांना आठवताना त्यांची जयंती, स्मरणदिन नित्यनेमाने जोमात साजरी करत असताना वर्तमानातील शिक्षण व्यवस्थेची अवस्था नेमकी काय आहे, याचा विचार म्हणूनच केला पाहिजे. प्रत्येक  भारतीय नागरिकाला त्याच्या जात धर्माचा सामाजिक आर्थिक स्तराचा विचार न करता दर्जाची आणि संधीची समानता देण्याचे वचन आपल्या घटनेची उद्देशिका आपल्याला देते. दर्जाच्या आणि संधीच्या समानतेच्या या दरवाजाची गुरुकिल्ली शिक्षण आहे. पण आज ही गुरुकिल्ली सर्वांना सहजतेने उपलब्ध होईल, अशी अवस्था आहे का, याचा विचार आपण करायला हवा.

अगदी पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत देशपातळीवर शिक्षणाची अवस्था काय आहे ? युनिफाईड डिस्ट्रिक्ट इनफॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन या शासकीय यंत्रणेची २०२३ -२४ ची माहिती सांगते की ६ ते १७ वर्षे या वयोगटातील देशातील एकूण शाळाबाह्य मुलांची संख्या ही सुमारे ४ कोटी ७४ लाख एवढी आहे म्हणजे त्या वयोगटातील मुलांच्या जवळपास १७ टक्के आहे. वय वर्षे १६ -१७ मधील प्रत्येक चौथे मूल हे शाळाबाह्य आहे. आपल्या देशातील एक चतुर्थांश मुले जर शाळेतच जात नसतील तर संधीची आणि दर्जाची समानता त्यांच्या वाटेला कशी येणार आहे ? वय वर्षे १८ ते २३ मधील निव्वळ २८ टक्के मुले उच्च शिक्षण घेतात.

पूर्व प्राथमिक शिक्षण , प्राथमिक शिक्षण या बाबतीत काही गोष्टी काळजी कराव्या अशा आहेत. ग्रामीण भागात सरकारी शाळांचा पट दिवसेंदिवस कमी होतो आहे. ग्रामीण भागातही खाजगी शाळांची संख्या वाढते आहे आणि अशा शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठविण्याची पालकांची वृत्तीही वाढीस लागलेली आहे. शहरी भागात सरकारी माध्यमिक शाळांची संख्या अगदी नगण्य आहे. पालकांना आपली मुले खाजगी शाळांत पाठविण्याशिवाय इलाज नाही, अशी परिस्थिती आहे. अकरावी, बारावी ही वर्षे आपल्याकडे १०+२+३ या शिक्षण रचनेमुळे महत्वाची मानली जातात. या दोन वर्षांची अवस्था तर अजून बिकट आहे. विशेषतः विज्ञान शाखेतील ज्युनिअर कॉलेजस नावाला आणि कागदावर उरली आहेत. सर्व विद्यार्थी क्लासेस लावतात त्यामुळे वर्गात काही शिकवले जात नाही. क्लासेसची फी अव्वा की सव्वा असते आणि ती कष्टकरी, कामकरी , असंघटीत क्षेत्रात काम करणा-या व्यक्तीच्या मुलांना परवडू शकत नाही. त्यामुळे वर्गात शिकवत नाहीत, क्लासेस परवडत नाहीत,अशा अवस्थेत आपल्या करियरच्या अगदी निर्णायक टप्प्यावर ही मुले आढळतात.जणू काही गरीब घरातील मुलांना विज्ञान शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर असा व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे जाण्याचा रस्ता बंदच झाल्यात जमा आहे. त्यातही या सा-याचा परिणाम मुलांपेक्षा मुलींच्या शिक्षणावर अधिक विपरित होतो आहे. स्टेम ( सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स ) शिक्षणात आणि एकूणच वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात खाजगी शैक्षणिक संस्था प्रचंड वेगाने वाढत आहेत त्यामुळे परिघावरील विद्यार्थ्यांना संधीची ही सारी दारे बंद झाल्यात जमा आहे. दुसरीकडे उच्च शिक्षण संस्थांमध्ये, विद्यापीठांमध्ये मोठया प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या शिक्षणाची गुणवत्ता वेगाने ढासळते आहे. अलिकडील काळात शिक्षण संस्थांमध्ये उजव्या विचारांचा प्रभाव वाढतो आहे. वैचारिक आणि आर्थिक भ्रष्टाचाराच्या मार्गानेच शिक्षक, प्राध्यापकांची पदे भरली जात आहेत. त्यामुळे एकूणच आशय आणि इतर बाबतीतही उच्च शिक्षण आपली गुणवत्ता हरवते आहे. एकीकडे शिक्षण बाजारातील महागडी वस्तू झाल्याने ती सर्वसामान्यांच्या कक्षेबाहेर जाते आहे तर दुसरीकडे शिक्षकांची रिक्त पदे, विशिष्ट विचारांचा अनाठायी प्रभाव यामुळे हरवत चाललेली गुणवत्ता यामुळे शिक्षण क्षेत्रात एक विलक्षण गंभीर पोकळी निर्माण झालेली आहे.



शिक्षण हक्क कायदा झाला तरी आपला शिक्षणावरील खर्च जीडीपीच्या ३ ते ४ टक्क्यांमध्येच रेंगाळतो आहे तो आपण ६ टक्क्यांपर्यंत तरी पुढे न्यायला हवा. या सगळयाचा परिणाम म्हणून जॉब मार्केटमध्ये भारतीय तरुण किमान कौशल्यामध्ये मागे पडतो, असे काही अभ्यास सांगतात.

या आणि अशा पार्श्वभूमीवर आपण महात्मा फुले आणि बाबासाहेबांना आठवत आहोत.

'विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।

नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।'

इतक्या नेमक्या भाषेत अविद्येचे परिणाम फूल्यांनी सांगितले. दर्जाची आणि संधीची समानता आश्वासित करताना बाबासाहेबांनी शिक्षणाची गुरुकिल्ली आपल्या हाती दिली पण आज आपण ती या चकचकीत मॉलमध्ये हरवली आहे. शिक्षणाचा हा हौद पुन्हा एकदा सर्वांसाठी खुला करावयाचा असेल तर शाहू, फुले ,आंबेडकरांना मानणा-या आपण सगळयांनी आपली सगळी राजकीय ,सामजिक , आर्थिक आणि सांस्कृतिक लढाई शिक्षण या एकाच विषयाभोवती केंद्रीत केली पाहिजे. आजच्या काळाची सगळी उत्तरे यातच दडली आहेत पण आपण आजच्या हंटर कमिशनसमोर हंटर घेऊन कधी उभे राहणार, हाच एकमेव प्रश्न वर्तमान आपल्याला विचारतो आहे.

 

-         --     प्रदीप आवटे.

Thursday, 23 January 2025

मि. प्रेसिडेंटपेक्षा मरियन बडी !

                

           दिनांक २० जानेवारी २०२५ रोजी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. त्यानंतर नॅशनल प्रेयर सर्विस निमित्ताने बोलताना वॉशिंग्टन शहराच्या पहिल्या महिला बिशप मlरियन बडी यांनी आपले विचार व्यक्त केले. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षासमोर बोलताना साठी ओलांडलेल्या मेरियन बडी यांनी जे धाडस दाखवले आहे ते खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. त्यांचे हे छोटेसे भाषण नीट ऐकले तर ते ऐकता ऐकता १८९३ साली शिकागोच्या धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी केलेल्या भाषणाचे सूर आपल्या कानावर पडू लागतात, इतके हे भाषण महत्त्वाचे आहे. मानवी जगण्यातील धर्मासह साऱ्या संकल्पनाच आपला अर्थ हरवून बसलेल्या असताना धर्म या संकल्पनेची नेटकी व्याख्या देखील मरियन बडी यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा आपल्यासमोर ठेवली आहे.


मरियन बडी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उद्देशून, त्यांच्याकडे पाहत अत्यंत नम्रपणे त्यांना सांगतात, 

"मला तुम्हाला एक शेवटची विनंती करायची आहे. मिस्टर प्रेसिडेंट, लाखो लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवलाय आणि जसं तुम्ही काल अवघ्या देशाला सांगितलं, त्या प्रेमळ परमेश्वराचा सर्वशक्तिमान हात तुमच्यासोबत आहे.
त्या आपल्या परमेश्वराची आठवण ठेवत मी आपल्याला सांगू इच्छिते की, आपल्या देशातील अनेक लोक खूप घाबरलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही दयार्द बुद्धीने वागावे
 गे, लेसबियन आणि ट्रांसजेंडर मुलं प्रत्येक कुटुंबात आहेत, मग ती कुटुंब डेमोक्रॅटिक असतील,रिपब्लिकन असतील की स्वतंत्र विचारांची!  ही सगळीच त्यांच्या जीवाच्या भीतीने घाबरून गेली आहेत."


"...आणि ते लोक जे आपली पिकं काढायला मदत करतात, आपल्या ऑफिसची स्वच्छता करतात, आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये, आपल्या मिटपॅकिंग प्लांट्स मध्ये काम करतात, आपण हॉटेलमध्ये जेवल्यावर आपली ताटं विसळतात, आपल्या हॉस्पिटलमध्ये रात्रपाळी करतात, कदाचित ते आपल्या देशाचे नागरिक नसतील किंवा त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्रे नसतील पण या स्थलांतरित लोकांपैकी बहुसंख्य लोक हे गुन्हेगार नाहीत. ते टॅक्स भरतात, ते आपले चांगले शेजारी आहेत. ते आपल्या चर्च,  मशिदी, सिनेगॉग, गुरुद्वारा आणि मंदिरांचे विश्वासू सदस्य आहेत."

"मिस्टर प्रेसिडेंट, आपला समाजातील ज्या मुलांना आपले पालक आपल्यापासून हिरावून घेतले जातील अशी भीती वाटते त्या सगळ्यांसाठी मी दयेची याचना करते आणि युद्धजन्य भागातून,प्रचंड छळाला त्रासून जे लोक आपापले देश सोडून इथं आसऱ्यासाठी आले आहेत त्यांना सहानुभूतीने आणि प्रेमाने वागवलं जावे अशी विनंती करते."

 "आपला परमेश्वर आपल्याला शिकवतो की, अनोळखी माणसांसोबत दयेने वागा आणि आपण विसरता कामा नये की आपणही कधीकाळी या देशामध्ये अनोळखीच होतो."

 "तो सर्वशक्तिमान आभाळीचा बाप प्रत्येक माणसाला प्रतिष्ठेने वागवण्यासाठी आवश्यक अशी ताकद आणि धाडस आपल्याला देवो,  एकमेकांशी प्रेमाने सत्य बोलण्याची क्षमता देवो आणि आपण सर्वांनी एकमेकांसोबत आणि आपल्या परमेश्वरासोबत ही वाट चालताना या देशातील आणि जगातील सर्व लोकांच्या भल्याचाच विचार आपल्या मनात असो !"

या भाषणात काय नाही? ज्ञानदेवाचे अवघे पसायदान इंग्रजी भाषेत अनुवादित केले तर ते याच्याहून वेगळे काय असेल ? 'दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती 'या तुकोबाच्या अभंगाचा आशय याहून वेगळा कसा असेल?  धर्म समाजाची धारणा करतो आणि म्हणून समाजातील प्रत्येक माणसाची काळजी त्यानं आपुलकीने आणि जिव्हाळ्यानं घेतली पाहिजे आणि जर सत्तेच्या सर्वोच्च पदावर बसणारे लोक माणसांमध्ये भेदभाव करत असतील तर 'भेदभाव धर्म अमंगळ' हे उच्च रवाने ठणकावून सांगण्याचे धाडस देखील खऱ्या धार्मिक व्यक्तीत असले पाहिजे. कारण खरी धार्मिक व्यक्ती ही भित्री आणि सत्तेपुढे नमणारी नसते तर वेळप्रसंगी सत्तेला देखील दोन शब्द सुनावण्याचे नैतिक धैर्य तिच्या अंगी असते.'अंकल टॉम्स केबिन ' लिहिणाऱ्या 
हॅरियट बीचर स्टोवेबद्दल बोलताना,' अमेरिकन यादवी युध्दाला कारणीभूत ठरलेली एक एवढीशी स्त्री ' असे उद्गार अब्राहम लिंकन यांनी काढले होते. परवाच्या भाषणानंतर आणखी एक एवढीशी मरियन प्रेसिडेंट पेक्षा बडी वाटली, हे मात्र खरेच !

अर्थात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना हे सारं प्रवचन अत्यंत बोअरिंग आणि त्रासदायक वाटलं. मेरीयन बडी यांनी देशाची बिनशर्त माफी मागितली पाहिजे असे ट्रम्प यांनी याबद्दल म्हटले आहे.रिपब्लिकन पक्षाच्या एका खासदारांनी तर देशाबाहेर पाठवण्याची व्यक्तींची जी यादी आपण तयार करतो आहोत त्यात या बिशप बाईंचे नाव पहिले असले पाहिजे,असेही म्हटलं.  

दया, क्षमा,शांती आणि प्रेमाचा मार्ग दाखवणाऱ्या माणसांचं बोलणं कंटाळवाणे आणि बोअरिंग वाटावं, त्रासदायक वाटावं ,असाच हा सारा काळ आहे. धर्माच्या नावावर मॉब लिंचींग, आगी लावणे, दंगली भडकावणे हे जिथे समाजसंमत होत चालले आहे तिथे दया क्षमा शांती आणि प्रेमाची गोष्ट करणारी माणसं वेडपटच ठरणार आहेत. त्यांना प्रत्येक देशाबाहेर हाकलण्याची मागणी होत राहणार, कदाचित त्यांचा कोणताच देश नाही.

आणि तरीही ' वैष्णव जन तो तेने कहीये ,जो पीर पराई जाने रे,' असे सांगणारे आमच्या गुजरातचे नरसी मेहता अजून कालबाह्य झालेले नाहीत, याची खूण परवा या मरियन बाईंना ऐकताना झाली आणि मन विलक्षण आनंदाने ओसंडून वाहू लागले.
मनात आले,   

"स्वतः भोवती फिरत राहिलेल्या
पृथ्वीचा अक्ष पदर,
अजूनही          
पुरता ढळलेला नाही,
अजूनही ध्रुवीय प्रदेशातील
सगळेच बर्फ वितळलेले नाही.

अजूनही तरेल हे जग...
नक्कीच !" 

~ प्रदीप आवटे.

Tuesday, 16 July 2024

साहेबाचा पो-या मोठा अकली...

 निवडणूका आणि आरोग्य

नुकतीच इंग्लंडमध्ये निवडणूक पार पडली आणि तेथील १४ वर्षाची हुजूर पक्षाची राजवट संपुष्टात आली आणि मजूर पक्षाला तेथील जनतेने भरघोस बहुमताने निवडून दिले. एका अर्थाने हा मोठा ऐतिहासिक सत्तापालट या देशामध्ये झाला. हुजूर पक्षाचा पराभव होण्या पाठीमागे नेमकी काय कारणे आहेत, याचा जेव्हा विचार आपण करू लागतो तेव्हा तेथील सुमारे ४१ टक्के लोकांनी ढासळती आरोग्य व्यवस्था हे हुजूर पक्षाच्या पराभवाचे प्रमुख कारण सांगितले आहे. एखाद्या देशातील सत्तांतर हे निव्वळ आरोग्याच्या मुद्द्यावरून होणे हे खरोखरच आम्हां भारतीयांसाठी तर अगदीच कल्पनेपलीकडील आहे असे म्हणायला हरकत नाही. अगदी कोविड महामारी सुरू असताना देखील त्या कालावधीत झालेल्या काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये आरोग्य हा विषय कधीही राजकारणाचा महत्त्वाचा विषय आपल्याकडे ठरला नाही. कोविडच्या महामारीनंतर जी लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली त्यात देखील आरोग्याचा मुद्दा कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंडयावर नव्हता, हे आपण अनुभवले आहे. असे असताना ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्षांहून अधिक राज्य केले त्या देशातील निवडणूक मात्र आरोग्याच्या मुद्द्यावर लढली जाते, हे आपणा सर्वांसाठी महत्वाचे आहे. विकसित देशातील राजकारण आणि आपल्यासारख्या विकसनशील देशातील राजकारणामध्ये हाच मूलभूत फरक आहे का, असाही विचार आपण करावयाला हरकत नाही. 



राष्ट्रीय आरोग्य सेवा अर्थात नॅशनल हेल्थ सर्विस ही सरकारी यंत्रणा इंग्लंड मधील सर्व नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरविते. निगेल लॉसन यांनी म्हटल्याप्रमाणे," इंग्लिश जनतेसाठी राष्ट्रीय आरोग्य सेवा जणू धर्मासारखी अत्यंत जवळची गोष्ट आहे." बार्बरा कॅसल आणि अनेकांनी नॅशनल हेल्थ सर्विस हे जणू इंग्लिश जनतेचे सेक्युलर चर्च आहे, अशी भावनाही वेळोवेळी व्यक्त केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये या आरोग्य सेवेची परिस्थिती अत्यंत कठीण झालेली आहे सुमारे ७६ लाख लोक या वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या वेटिंग लिस्टवर असून त्यांना डॉक्टरांची अपॉइंटमेंट वेळेत मिळत नाही आहे.२०१० पासून या वेटिंग लिस्टमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. सुमारे तीन लाख लोकांना एक वर्षाहूनही अधिक काळ डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळण्याकरता वाट पाहावी लागते, असे तेथील आकडेवारी सांगते अर्थात डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळण्यासाठीचा सरासरी कालावधी आहे सुमारे १४ आठवडे. विकसित देशांमध्ये लोक आपल्या आरोग्यवस्थेचे मूल्यांकन करण्याकरता विविध निर्देशांक वापरतात. तातडीची वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी तुम्हाला किती काळ वाट पाहावी लागते, हा निर्देशांक देखील यामध्ये महत्त्वाचा मानला जातो. तातडीची वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी जर रुग्णाला चार तासांपेक्षा अधिक काळ वाट पाहावी लागत असेल तर ते आरोग्यवस्थेचे फार चांगले लक्षण नाही. २०११ मध्ये केवळ सहा टक्के इंग्लिश रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी चार तासांपेक्षा अधिक काळ लागे पण तेच प्रमाण सध्या ४५ टक्क्यांवर गेले आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवेसाठीची आर्थिक तरतूद मजूर पक्षाचे सरकार असताना दरवर्षी सहा टक्क्यांनी वाढत असे तथापि हुजूर पक्षाच्या या चौदा वर्षांच्या कालावधीमध्ये ही वार्षिक वाढ केवळ दोन टक्क्यांची आहे. त्यामुळे मागील १४ वर्षात या पक्षाने राष्ट्रीय आरोग्य सेवेकरता पुरेसा निधी दिला नाही, अशी ही नागरिकांची एक रास्त तक्रार आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवेमध्ये काम करणाऱ्या नर्सेस आणि इतर मनुष्यबळांचे वेतन पुरेशा प्रमाणात न वाढणे आणि त्या कारणामुळे मनुष्यबळाने या व्यवस्थेतून बाहेर पडणे हे देखील एक मोठे आव्हान इंग्लंडच्या या सेक्युलर चर्च मानल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेसमोर उभे राहिले आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन येथील साथरोगशास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉ. मायकल मार्मो यांनी म्हटल्याप्रमाणे, आरोग्याच्या अनुषंगाने एका आव्हानात्मक वळणावर इंग्लंड येऊन ठेपले आहे. येथील लोकांच्या आरोग्यामधील सुधारणा जणू पॉज झाल्या आहेत आणि आरोग्यविषयक विषमता वाढते आहे. जणू काही इंग्लिश लोक ज्या अवस्थेत जन्मले, वाढले आणि जगत आहेत, काम करत आहेत, वयोवृद्ध होत आहेत त्या अवस्थेमध्ये सुधारणा होण्याचे थांबले आह. मार्मोट यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणत्याही देशाची सरकारे अनेकदा आपल्यासमोरील आव्हानांचे वर्णन करताना आरोग्य हा त्यातील एक मुद्दा असल्याचे बोलतात आणि आर्थिक परिस्थिती, महागाई, शिक्षण, परवडणारी घरे, स्थलांतरित लोकसंख्या, गरिबी, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी अशा बाबींना अधिक महत्त्व असल्याचे सांगतात. सार्वजनिक आरोग्य तज्ञ असणारे डॉ. मायकेल मार्मो अत्यंत मार्मिकपणे सांगतात की, इतर सारे मुद्दे हे आरोग्याचे सामाजिक निर्धारक आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या जनतेला गुणवत्तापूर्ण अशी आरोग्यसेवा त्यातील विषमता दूर करून पुरवता त्यावेळी तुमच्या अर्थकारणासाठी देखील निरोगी मनुष्यबळ मिळते.त्यामुळे त्याला अधिक गती प्राप्त होते. निरोगी व्यक्ती शिक्षण, रोजगार या क्षेत्रात अधिक उत्तम काम करू शकते म्हणजे तुमच्या एकूण राजकीय धोरणांचा केंद्रबिंदू हा तुम्ही जनतेला पुरवीत असलेल्या आरोग्य सेवा असल्या पाहिजेत. कारण त्या तुमच्या सर्व सामाजिक घटकांवर प्रभाव टाकतात.’



भारतासारख्या देशाला इंग्लंडमधील ही निवडणूक आणि त्या अनुषंगाने झालेली राजकीय - सामाजिक चर्चा ही खूप काही शिकवणारी आहे. आरोग्य आणि शिक्षण हे मुद्दे आपल्या राजकीय चर्चेमध्ये खूप अभावानेच डोकावतात. जणू ते आपल्या राजकीय चर्चेच्या अजेंडयावरच नसतात, अशी एकूण परिस्थिती आहे. आपल्यासमोर देखील आरोग्याचे खूप मोठे प्रश्न आ वासून उभे आहेत. एकूण जीडीपीच्या कसाबसा दीड टक्का आपण आरोग्यावर खर्च करतो आहोत. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यवस्था सक्षम होण्यासाठी खूप मोठा हातभार लागत नाही. आपल्या समाजात त्यामुळेच अनिर्बंध अशी खाजगी आरोग्य सेवा समांतर पद्धतीने वाढताना दिसते आहे. आरोग्यावरील खर्चामुळे गरीबी रेषेखाली ढकलल्या जाणा-या लोकसंख्येचे प्रमाण लक्षणीय आहे. अशा काळात आपल्याला देखील इंग्लंडच्या नागरिकांप्रमाणे आपल्या आरोग्यसेवा हाच आपला धर्म मानून त्याबद्दलची चर्चा एकूण राजकीय सामाजिक कथनाच्या केंद्रस्थानी आणणे अत्यंत आवश्यक आहे.

आरोग्य हा केवळ व्यक्तीच्याच नव्हे तर समाजाच्या देखील व्यक्तिमत्त्वाचा आत्मा असतो हे सत्य केवळ सुभाषितांपुरते मर्यादित न राहता ते प्रत्यक्ष व्यवहारात उतरायला हवे. अनेकदा आपण वसाहतवाद आणि त्याचा प्रभाव आपण पुसून टाकला पाहिजे असे म्हणतो परंतु गोऱ्या साहेबांकडून काही गोष्टी शिकण्याची देखील गरज आहे, हे त्यांच्या नुकत्याच झालेल्या ब्रिटनमधील निवडणुकांनी स्पष्ट केले आहे. इंग्रजांनी भारतात पहिल्यांदा रेल्वे सुरु झाली तेव्हा ‘ सायेबाचा पोर मोठा अकली, बिन बैलाची गाडी कशी ढकली,’अशी इथल्या जनतेची प्रतिक्रिया होती तसेच आता ‘ सायेबाचा पोर मोठा अकली, आरोग्यावर निवडणूक कशी लढवी?,’ असे म्हणत त्यांचे सकारात्मक अनुकरण करण्याची आवश्यकता आहे.

 - डॉ. प्रदीप आवटे. 

Wednesday, 26 June 2024

शाहू महाराजांनी दाखवलेली लोककल्याणकारी वाट - प्रदीप आवटे.


            
    शाहू महाराज यांची आज जयंती. आजच्या या दिवसेंदिवस विखारी होत चाललेल्या वातावरणात शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा एक धावता आढावा घेऊ. महाराजांनी केलेले काम आजच्या काळात आपल्याला योग्य रस्ता दाखविणारे आहे

अवघ्या २८ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत एक लोककल्याणकारी, भेदभावरहित, सर्वांना प्रगतीचे संधी देणारे राज्य शाहू महाराजांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या कामाचा हा एक अगदी धावता आढावा.

शिक्षण प्रसार -

  • ·       १९१७ ते १९२२ – राज्याचा २३ टक्के निधी शिक्षणावर खर्च .
  • ·       शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
  • ·       ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली.
  • ·       गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. 

जातिभेद आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य -

  •         जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
  •        अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले
  •        अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.
  •        अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळया शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली.
  •        मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले.
  •        शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला.
  •         डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते.

स्त्री उध्दाराचे कार्य -

  •        स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. 
  •        १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
  •        त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.
  •        धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली.
  •        जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा-धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.

गुन्हेगार समजल्या जाणा-या जातीजमातीसाठी कार्य -

  •        त्या काळातील परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला.
  •        ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे.
  •        शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने सर्व जनतेचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. या भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.

मुस्लिम समाजासाठी केलेले कार्य -

  •        शिक्षणासाठी इच्छुक मुस्लिम समाजातील १० विद्यार्थ्यांना कोल्हापुरात स्थापन झालेल्या ‘विक्टोरिया मराठा बोर्डिंग’मध्ये प्रवेश देऊन त्यांनी मुस्लिमांच्या शिक्षणास सुरुवात करून दिली.
  •        या १० विद्यार्थ्यांमध्ये कर्नाटकातील अथणी गावचा शेख मोहम्मद युनूस अब्दुल्ला या नावाचा विद्यार्थी होता. या विद्यार्थ्याने राजाराम महाविद्यालयातून पदवी मिळविल्यावर त्याला महाराजांनी आपल्या संस्थानात मामलेदार म्हणून नियुक्त केले. तसेच मुस्लीम समाजाला शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचे काम त्याच्यावर सोपवले.
  •        सन १९०६ साली शाहू महाराजांनी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित मंडळींची सभा बोलावून ‘मोहमेडन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. स्वतः महाराज या संस्थेचे अध्यक्ष झाले व युसुफ अब्दुल्लांना कार्यवाह केले. मुस्लीम बोर्डिंग सुरू करण्यात आले.
  •        महाराजांनी या समाजाच्या विविध धार्मिक स्थळांचे उत्पन्न मुस्लीम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा आदेश काढला. कसबा रुकडी, पेटा हातकणंगले येथील श्री हजरत पीर दर्गा व कोल्हापूर शहरातील निहाल मस्जिद, घोडपीर, बाबू जमाल व बाराइमाम या देवस्थानचे उत्पन्नही मुस्लीम बोर्डिंगला देण्यात आले. या शाळेसाठी शहरात मराठा बोर्डिंग जवळच २५ हजार चौरस फुटांची मोकळी जागा देऊन इमारतीसाठी साडेपाच हजार रुपयांची देणगी व संस्थानातील जंगलातून मोफत सागवान देण्यात आले. ही एकूण मदत मराठा बोर्डिंगपेक्षाही अधिक होती.
  •        पाटगावच्या मौनी बुवांच्या मठाच्या उत्पन्नातून काही रक्कम तेथील मुसलमानांच्या मशिदीच्या बांधकाम खर्चासाठी म्हणून देण्याचा एक हुकूम शाहू महाराजांनी काढला.
  •        रुकडीतील पिराच्या देवस्थानच्या उत्पन्नातील काही भाग तेथील अंबाबाईच्या मंदिरातील दैनंदिन सेवेसाठी खर्च होत होता. अशी अनेक उदाहरणे शाहू महाराजांच्या मुस्लीम समाजाच्या उद्धारासाठी असलेल्या धोरणातून दिसून येतील.
  •        मंदिरांच्या उत्पन्नातील भाग हा मुस्लीम समाजाच्या शिक्षणासाठी व मुस्लीम धर्म स्थळांच्या उत्पन्नातील वाटा हा हिंदू मंदिराच्या खर्चासाठी देण्याचे हे धोरण आजच्या राजकर्त्यांना व समाजात द्वेष पसरवणाऱ्या शक्तींना पुरून उरणारे आहे.
  •        शाहू महाराजांच्या कन्या अक्कासाहेब महाराज यांच्या विवाह प्रसंगी मराठा वधू-वरांचे अनेक विवाह लावले गेले, त्यासोबत काही मुस्लिम जोडप्यांचेही विवाह लावण्यात आले. या नवविवाहित जोडप्यांच्या आयुष्यभरच्या उदरनिर्वाहाची व्यवस्थाही करण्यात आली.
  •        मुस्लिम पवित्र धर्मग्रंथ कुराण अरबी भाषेत असल्याने त्याचा अर्थ सामान्य मुस्लिमांना समजत नव्हता. कुराणातील धर्म तत्त्वे सामान्य मुस्लिमांनाही समजली पाहिजेत यासाठी पवित्र कुराणचे मराठी भाषांतर करण्याचे काम महाराजांनी सुरू केले होते. याकरिता दरबारातील २५ हजार रुपयांची मोठी रक्कम खर्ची घातली होती. महाराजांचे अकाली निधन झाल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही.
  •        शाहू महाराजांनी नव्याने वसविलेल्या शाहूपुरी पेठेत मशीद नव्हती. तेव्हा तेथील मुस्लिमांच्या सोयीसाठी महाराजांनी जागा तर दिलीच शिवाय मशीद बांधकामासाठी एक हजारांहून अधिक रक्कम दान केली. बोहरी हे मुस्लीम समाजातील सधन व व्यापारी होते, पण त्यांना समाजासाठी स्वतःची मशीद नव्हती तेव्हा बोहरींचे पुढारी तय्यबली यांनी महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली. महाराजांनी शहराच्या मध्यवस्तीतील पाच हजार चौरस फुटांची जागा बोहरींच्या मशिदीसाठी दिली.
  •        महाराजांनी राधानगरी हे नगर नव्याने बसवले होते. त्या ठिकाणी हिंदूंसाठी दोन मंदिरांच्या बरोबरच मुस्लिमांसाठी हजरत पीर गैबी साहेब आणि शहाज महाल ही दोन देवस्थाने निर्माण केली. त्यांना उत्पन्न जोडून दिले व या देवस्थानांना ७५ रुपयांची विशेष देणगीदेखील दिली.
  •      त्याकाळी ब्रिटिश इंडियामध्ये इतर भागांत दंगली होत होत्या पण छत्रपती शाहू महाराजांच्या काळात केव्हाही धार्मिक दंगली झाल्या नाहीत. ही शाहू महाराजांच्या धोरणांचे यश होते.  
  •       १५ एप्रिल १९२० रोजी नाशिक येथे केलेल्या भाषणात शाहू महाराज म्हणतात, “मुंबई, सोलापूर, अहमदाबाद, अमृतसर, लाहोर वगैरे ठिकाणी जे दंगे झालेत त्यात सुशिक्षित पुढारी मागे राहून गरीब लोकांवर प्रसंग आला, याचे कारण त्यांचे अज्ञान आहे. पुढाऱ्यांचा कावा त्यांना समजला नाही. लोकांना थोडे जरी शिक्षण असते, तरी असे प्रकार झाले नसते.”
  •         त्याच भाषणात पुढे ते म्हणतात, “आमचे खरे महात्मा बादशहा अकबर शहा हेच आहेत. ज्याने हिंदू मुसलमानांची एकी केली व स्वतः जोधाबाई नावाच्या रजपूत स्त्रीशी लग्न करून तिला हिंदूच राहू दिले व सूर्याला अर्घ्य देण्याकरिता लाखो रुपये खर्च करून व्यवस्था केली. त्याची साक्ष हल्ली आग्र्याचा किल्ला देत आहे. जी गोष्ट विसाव्या शतकात अशक्य झाली आहे ती सतराव्या शतकात यवन बादशहाने शक्य केली होती.”
  •        शाहू महाराजांच्या भाषणातील हा उतारा आपण समजून घ्यावा असा आहे , “राज्य संपादन करण्याच्या महत्त्वाकांक्षेने पूर्वी या देशात लढाया झाल्या. अकबर, शिवाजी महाराज वगैरे महात्म्यांच्या काळी धर्मद्वेषाने किंवा जातीद्वेषाने कोणी लढाया करीत नसत. अकबर बादशहाच्या पदरी मराठी रजपूत इतर हिंदू सरदार व लढवय्ये होते. विजयनगरच्या राजाच्या पदरी किंवा शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमानांची संख्या कमी नव्हती या सर्वांनी स्वधर्मियांबरोबर किंवा स्वजातीयांबरोबर लढण्याच्या प्रसंगीदेखील आपले इमान कायम राखले अशा वेळी त्यांचे बंधुप्रेम चांगल्या प्रकारे दिसून येई.”

इतर कार्य –

  •        १८९६चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.
  •       शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
  •        कला, कुस्ती यांना प्रोत्साहन दिले.  चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.

असा लोककल्याणकारी राजा आपणां सर्वांना आजही आदर्शवत आहे. शाहू महाराजांची केवळ जयंती साजरी करुन , त्यांना वंदन करणे पुरेसे नाही, सर्वांना सोबत घेऊन चालण्यासाठी जी वाट त्यांनी दाखवली, त्या वाटेने आपण चालत राहणे हीच शाहू महाराजांना खरीखुरी श्रध्दांजली आहे.

( संदर्भ – मराठी विश्वकोश,  शाहू महाराज गौरव ग्रंथ इत्यादी)

*******