Sunday, 29 May 2016

बरं चाललंय ना हे ? - संवाद श्याम मनोहरांशी ...



बरं चाललंय ना हे ?
- डॉ प्रदीप आवटे.
    त्यांचं घर सापडेल ना व्यवस्थित, शहराच्या या डोक्यात न शिरणा-या फाफटपसा-यात. माझ्या मनात नाही म्हटलं तरी धाकधूकच होती. मी ती श्रीरंजनला बोलूनही दाखवली.
“कुठल्या काळात वावरताय तुम्ही ? आता मोबाईलमध्ये जीपीएस सिस्टिम आहे.”
ते ही खरंच होतं आणि तसंच झालं श्रीरंजननं अगदी कुठंही न अडखळता दीपरेखा सोसायटीच्या दारात आणून उभं केलं. आणि विजयी नजरेनं माझ्याकडं पाह्यलं.
“जीपीएसनं पत्ता सापडला तरी माणूस सापडतोच, असं नाही,” असं मी बोललो तेव्हा श्रीनं माझ्याकडं चमकून पाह्यलं.
माणूस सापडण्यासाठी काय करायला हवं असा विचार करत अत्यंत उत्सुकतेनं मी श्याम मनोहरांच्या घरात घुसलो. ज्या माणसाची उत्सुकता झोपतानाही संपत नाही त्या माणसाला भेटण्याची मला कमालीची उत्सुकता होती. आम्ही आलोय हे कळल्यासारखे मनोहर दार उघडून उभे होते. आपण दारात आलोय,हे त्यांना कसं कळलं असावं,असा विचार मनात आला की याचीही काही पध्दत असावी,असं वाटलं तेव्हा  मला त्यांनी महाराष्ट्र फौंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना सांगितलेला एक प्रसंग मला आठवत होता..
एकदा एका चांदण्या रात्री सगळया कुटुंबियांसोबत मनोहर घराच्या छतावर बसले असतानाचा प्रसंग.सोबत त्यांच्या घरात काम करणारी मोलकरीणही होती. ती सांगू लागली, “ लहानपणी आम्ही घराच्या माळवदावर बसलो की चांदण्या मोजायला सुरुवात करायचो. पण थोडया वेळानं एक गंमत व्हायची, आपण कोणत्या चांदणीपासून मोजायला सुरुवात केली हेच आम्ही विसरायचो, सगळंच मुसळ केरात..!” हा प्रसंग सांगून  श्याम मनोहर म्हणाले, चांदण्या मोजायची पध्दत आपण शोधून काढली पाहिजे, जगणं अर्थपूर्ण कसं करता येईल, याच्या पध्दती आपण शोधून काढल्या पाहिजेत. आणि बरंच काही. चांदण्या मोजायचा हा प्रसंग मला फारच आवडतो. माझ्या मोजायच्या राहिलेल्या चांदण्या मला आठवतात, म्हणून की काय कोण जाणे ? पण मोजायला कुठून सुरुवात करायची, हा प्रश्न आजही आहेच. श्याम मनोहरांशी बोलताना याची काही पध्दत सापडते का बघू, हा एक उद्देश होताच

  गप्पा सुरु होतानाच मी त्यांना माझ्याअडीच अक्षरांची गोष्टया सदराबद्दल माहिती दिली. सदरामागील संकल्पना स्पष्ट केली. खरं म्हणजे, श्याम मनोहरांसारखा सर्जनशील आणि फिक्शनकडे एक शोध म्हणून पाहणारा लेखक प्रेम या अमूर्त मानवी मूल्याकडे कसा पाहतो, हे मला समजावून घ्यायचे होते, त्यांच्या प्रेमाबद्दलच्या धारणा जाणून घ्यायच्या होत्या. आजही आपण उत्सुकतेने झोपतो पण उत्सुकतेने एकमेकांना भेटत नाही, बोलत नाही. अध्यात्मावर जन्मसिध्द अधिकार सांगताना आपण अजून शरीरावरील कातडी भेदू शकलो नाही, आपले प्रेम शरीरावरुन अंतर्मनाकडे  झिरपत नाही, असे का होत असावे, हे सारेच बोलायचे होते

सर्वाभूती प्रेम, ही खरं म्हणजे भारतीय सभ्यतेची धारणा आहे,” श्याम मनोहर बोलू लागले. त्यांचे बोलणे मुक्त प्रकट चिंतनासारखे होते. त्यात विधानार्थी वाक्यांपेक्षा जीव प्रश्नांच्या हुकाला जागोजागी अडकत होता.पण नवे कुतूहल घरटयातून प्रथमच बाहेर पाहत होते.
“अद्वेष्टा सर्व भूतानाम.  कोणत्याही सजीवाबद्दल द्वेष नको.द्वेषाची गैरहजेरी म्हणजे प्रेम. प्रेम हे एखाद्या दोन बाजू असणा-या कॉईनसारखं आहे.एका बाजूला प्रेम आहे आणि दुस-या बाजूला अप्रेमाच्या विविध छटा आहेत. मग ते नकोसं वाटणं असेल,तिरस्कार असेल,सेपरेशनची भावना असेल आणि अगदी कुणी तरी आपला सूड घेतोय म्हणून येणारे प्रत्युत्तर असेल. स्वतःचा अनुभव आणि इतरांबद्दलची निरिक्षणं करत असताना आपल्याला काय जाणवतं ?आपल्या मुलाला राजकारणात आणण्यासाठी धडपडणा-या नेत्यांकडं मी पाहतो,किंवा राजकारणात असणा-या दोन भावांकडे मी पाहतो.. सुरुवातीला सत्तेवर असणा-या भावासमोर दुय्यमत्व घेऊन सेक्रेटरी स्वरुपाची कामं करणारा भाऊ नंतर त्या भावालाच टसल देऊ लागतो. हे सगळं व्यवहारात दिसणारं प्रेम आहे.हे सगळं पाहताना प्रेम ही कालातीत गोष्ट माणसाला सापडलेली नाही की काय,असा प्रश्न मला पडतो.” तळजाई टेकडीवरुन अंधाराचा काळा मठ्ठ बैल हळूहळू खाली उतरु लागला होता. तरीही खिडकीतून आल्हाददायक वारा आत येत होता.काळया मठ्ठ बैलाला न घाबरता मन एका नव्या आशेने समोरुन येणा-या आवाजाकडे पाहत होते.
“मला माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत.या करिता माझी क्षमता आणि माझ्यावर प्रेम करणारे लोक यांची मदत मी मागतो.जर माझ्या प्रेमाच्या लोकांनी मला मदत केली तर माझं जगणं सुकर करणा-या या लोकांवर माझ्रे प्रेम बसते.ही प्रेमाची बाहेरची व्यवस्था आहे.पण प्रेमाची आतली व्यवस्था देखील आहे.प्रेम घर्षण नाहीसं करतं.प्रेम नांदणा-या मनात घर्षण उरत नाही” मानवी जगणे ही एक भौतिक घटना आहे का ? शोधावं लागेल, पण श्याम मनोहर एका भौतिकीच्या नजरेतून जगण्याचा पट पाहत असतात.
“आता एक गंमतीचा भाग.सुदामा आणि अर्जुन दोघंही कृष्णाचे मित्र होते. पण या दोघांना कृष्णाने काय दिले ? कृष्णाने सुदाम्याला भौतिक संपत्ती दिली कारण तो अत्यंत गरीब होता पण कृष्णाने त्याला गीता दिली नाही आणि अर्जुनाला गीता दिली. गीता ही सुदाम्याची गरजच नव्हती की काय?प्रेमाची अभिव्यक्ती ज्याच्यावर प्रेम करायचे तो कोणत्या स्थितीत आहे,त्यानुसार असते की काय,असा एक प्रश्न मला पडतो,” श्याम मनोहर आणखी एक प्रश्नजाल टाकतात.
भारतीय सभ्यतेत आई आणि मुलाचे प्रेम प्रामुख्यानं मांडलं गेलेलं आहे. आज दिसणारं स्त्री पुरुष प्रेम हे आधुनिक काळात पुढं येताना दिसत आहे,हे सर स्प्ष्ट करतात. आणि तरीही स्त्री पुरुष प्रेमाचे विविधांगी कंगोरे कला साहित्यात दाखविले जात नाहीत,याच खंतही ते व्यक्त करतात. आणि मधूनच आम्हां दोघांकडे पाहत सर विचारतात “बरं चाललंय ना हे?”
“प्रेमाची तीव्रता कमी जास्त असते की काय? आणि पुन्हा ही तीव्रता व्यक्तीनिष्ठ नसून कालनिष्ठ असते आणि म्हणूनच काल परवा पर्यंत त्याच्याशिवाय जगणार नाहीम्हणणारे कोणी विपरित परिस्थितीत त्याच्याशिवाय ही जगताना दिसते. वरवर पाहता वाटली तरी ही विसंगती नसते,” सरांचे मनन प्रेमाला चहूबाजूंनी चाचपू लागते.
श्याम मनोहर आणि डॉ प्रदीप आवटे

आजही सहजप्राप्य वाटणारं प्रेम मिळवण्यासाठी भारतीय तरुणांना  किती उर्जा खर्ची घालावी लागते,त्याचं काय ? जात धर्माच्या नावाखाली आपण प्रेमाचे सीमांतीकरण केले आहे,मी माझी खंत  श्याम मनोहरांना सांगतो.
“ लग्नाच्या संदर्भात जात धर्म ओलांडा,असं सांगणारा विचार प्रवाह आहे आणि तो छोटा का असेना ठळक होताना दिसतो आहे. कला आणि साहित्यातून त्याला बळ मिळताना दिसते आहे. पण आपल्या समाजातील आर्थिक विषमता ही अशा लग्नातील खरी मेख आहे. धर्म वेगळा आहे तरी करा लग्न,हे जोरात बोलता येईल,जात वेगळी आहे तरी करा लग्न हे जोरात बोलता येईल आणि बोललेही पाहिजे पण आर्थिक विषमता आहे तरी करा लग्न म्हणणं व्यावहारिक दृष्टया अवघड आहे. एखाद्या माणसाच्या क्षमता कमी असतील तरी त्याला जगायच्या सगळया सोयी सुविधा मिळतील,अशी समाजरचना अजून झालेली नाही.त्यामुळं प्रेमात ही धाकधूक अजून आहेच.”
आर्थिक वर्गाच्या दृष्टीनं सारखेपणा असल्यानं सहजपणे झालेल्या आंतरजातीय विवाहाची उदाहरणे श्याम मनोहर सांगतात.आणि अचानक ते ट्रॅक बदलतात, “ जगणं प्रधान आणि महत्वाचं आहे.जगणं सुकर व्हावं म्हणून प्रेमही आवश्यक आहे. पण प्रेम किती असावं ? सध्या मी नवीन कादंबरी लिहतो आहे. या कादंबरीत एक तरुण आहे.त्याच्या घरात तीन विचित्र घटना घडल्या आहेत.परस्परांवर निरतिशय प्रेम असणारे दोघं तिघं वारलेत.म्हणजे तीन जोडप्यांपैकी एक पार्टनर गेला की दुसरा विरहाने,अन्नत्याग करुन गेला आहे. या मुळं या तरुणाला धक्का बसला आहे.मला जास्त प्रेम करणारं कोणी नको,ही त्याची भावना झाली आहे.योग्य प्रेम म्हणजे किती प्रेम,याचा शोध मी या कादंबरीत घेतो आहे. खरं म्हणजे,पराकोटीचं तीव्रतर प्रेम ही आपली मानसिक भूक आहे.कलाकृती मधून आम्हांला ते पाहयला आवडतं.प्रत्यक्ष जगताना आम्ही जगू तडजोडी करत पण जीवनाचं आणखीन शुध्द स्वरुप काय आहे,हे आम्हांला निदान बुध्दीनं जाणायचं आहे म्हणून असं प्रेम आम्हांला कलाकृतीमधून पाह्यला,वाचायला आवडतं.जीवनाचं शुध्द स्वरुप पाहण्याची ही माणसाची इच्छा टिकून राह्यली पाहिजे,असं मला वाटतं.”
खेकसत म्हणणे,आय लव्ह यू,’ ही श्याम मनोहरांची एक कादंबरी. या नावातला अंतर्विरोध पुरेसा बोलका आहे. त्याबद्दल विचारले असता श्याम मनोहरांनी आपली भूमिका स्पष्ट केली,  “ही खरं म्हणजे 'ती आणि तो'ची गोष्ट या कादंबरीतील त्या दोघांना परस्परांना आय लव्ह यू म्हणायचंय.पण साध्या साध्या व्यवहारातून त्या दोघांची मानसिक स्थिती विस्कटून जाते. प्रेमाची अभिव्यक्ती ही कृती अथवा भाषेतून होते.पण विस्कटलेल्या मानसिक स्थितीमुळे या अभिव्यक्तीत विरुपता येते.आणि म्हणून प्रेमाचा उदघोष खेकसत करायची वेळ येते.”
येळकोट या मनोहरांच्या नाटकातील एक पात्र म्हणते,”सामाजिक रुढी,नियम,संकेत,कायदे काहीही असू देत पण दोन व्यक्तींचे जर एकमेकांवर प्रेम असेल तर ते चोरुन मारुन,कोणत्याही मार्गे प्रेम करतच राहतील.” मनोहर सांगत असतात, “पण माणसाच्या मनात प्रेम आहे तसेच इतर वाईट भावनाही आहेत.या वाईट भावनांना काय शिस्त लावायची ?एकतर्फी प्रेमाला काय शिस्त लावायची,याचा पुरेसा विचार भारतीय सभ्यतेत झाला नाही,असे मला वाटते.एकतर्फी प्रेम ही आजची महत्वाची समस्या अहे.आणि याचा बराचसा त्रास स्त्रियांना सोसावा लागतो.आपल्या व्यवस्थेत स्त्री पुरुष दोघांनाही नियम आहेत.पण स्त्री विषयक नियम कठोर पणे  पाळले जातात मात्र पुरुषांना सूट मिळते कारण ते स्वतःच ही व्यवस्था इक्झेक्यूट करतात.”
“एकूणच स्त्रीपुरुष प्रेम,मित्रा मित्रांमधील प्रेम या सर्वच बाबतीत समाजात प्रेम व्यक्त करण्याची फ्रेक्वेन्सी कमी होत जाताना दिसते,प्रेमाची तीव्रताही कमी होताना दिसते. खरं म्हणजे, सार्वजनिक प्रेमाच्या अंगानेही प्रेमाकडे पाहिले पाहिजे.  मी आणि कंडक्टर किंवा मी आणि दुकानदार किती प्रेम करणार ? एक माणूस आणि दुसरा माणूस यांच्यात काही अंशांचं तरी प्रेम असलं पाहिजे. यासाठी पध्दती-रिती निर्माण करणे यातून सभ्यता निर्माण होत असते. व्यवहार सुकर होतील, अशा पध्दती आणणे, हे सार्वजनिक प्रेम आहे. या करिता व्यक्तीचा लोभ कमीत कमी ऑपरेट होईल, अशी पध्दती शोधली पाहिजे. भारतीय मन लोभी आहे पण त्याचे ऑपरेशन कसे होते, हे शोधण्यासाठी अमेरिकन मॉडेल उपयोगाचे नाही. मुळात प्रेम या गोष्टीकडे मी आणखी वेगळया नजरेने पाहतो, ज्ञानक्षेत्रात काम करणा-या व्यक्तींना साह्यभूत होणे, क्रिएटीव्हिटीला साह्यभूत होणे म्हणजे प्रेम.”
समाजात जगणं आणि जीवन या बद्दलची समज वाढली पाहिजे. अहंकार जाणं आणि समज वाढणं उन्नत समाजाचं लक्षण आहे. समज वाढल्याने प्रेमाचा अविष्कार सहजगत्या होतो. आणि म्हणूनच सगळयांची समज वाढली पाहिजे. ‘लव्ह जिहादसारख्या गोष्टी सामाजिक समज भयाच्या छायेत नेतात.  लिव्ह इनरिलेशनशिप सैध्दान्तिक दृष्टया समज वाढल्याचे लक्षण आहे,” हे श्याम मनोहर मान्य करतात पण समाजाकडून ती कशाप्रकारे स्विकारली जात्येय यावर तिचे भवितव्य अवलंबून असल्याचे सांगतात.  चांगलं रुप, राह्यला बंगला, चांगले कपडे, उत्तम आरोग्य जरी नाही मिळालं, अगदी मरायचं क्षण आला तरी आपलं आपल्यावर प्रेम राह्यलं पाहिजे,’ हे 'बिनमौजेच्या गोष्टी' मधील वाक्य श्याम मनोहर पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित करतात. इगोला नाहक उर्जा पुरवू नका पण स्वतःवर प्रेम पाहिजे.
प्रेम करण्याच्या योग्य पध्दती शोधायला हव्यात , हे सांगताना श्याम मनोहर दोन अफलातून उदाहरणे देतात, “ माझ्या मनात एक गंमतीशीर प्रश्न आहे.  समजा एक बिल्डर आहे. त्याच्या धंद्यातला काळा व्यवहार तो टाळू शकत नाही. आता अशा व्यक्तीवर प्रेम करणा-या माणसाने काय करावे?  इथं फिक्शन किंवा कलाकृती टोकाची भूमिका घेताना दिसतात, बंड आणि व्यवस्थेशी लढाई दाखवली जाते. पण बहुसंख्यवेळा हे व्यवहार्य नसते. मला वाटते, प्रेम करणा-या व्यक्तीने सांगितले पाहिजे, ‘ तुला काळा व्यवहार टाळता येत नाही, हे ठिक आहे पण हे चुकीचं चाललं आहे हे आत आत ओळख. व्यवस्थेला टक्कर देण्याची तुझी ताकद नाही म्हणून तू हे सहन करतो आहेस, हे लक्षात ठेव. या काळया व्यवहारातून प्रॉपर्टी मिळव, एन्जॉय कर पण या सा-यातून मानसिक शक्ती आणि पर्यायाने सत्ता वाढवू नकोस.”
असेच दुसरे उदाहरण. माझे आणि मंत्र्यामध्ये प्रेम असायला हवे. मंत्री कदाचित माझ्याबद्दल अधिक प्रेम दाखवेल.मंत्र्याला दाखवावं लागेल प्रेम जनता म्हणून पण ते प्रेम दाखविताना मंत्री हा पॉवरफुल आहे ही भावना मला येते. पण त्या पॉवर त्या पदाच्या आहेत, व्यक्ती म्हणून त्याच्या नाहीत, हे त्याने लक्षात ठेवले पाहिजे. सत्ता डोक्यात जाता कामा नये.”
कम्युनिझम ज्या प्रमाणे सरप्लस उत्पन्नाची गोष्ट करतो त्याच प्रमाणे श्याम मनोहर सरप्लस सायकॉलॉजिकल पॉवरची गोष्ट करतात. “ सर, हा तुमचा सायकॉलॉजिकल कम्युनिझम दिसतोय,” असं मी गंमतीनं म्हटल्यावर सर हसले.
अहंकार गेला की एक नवीन जीवन सुरु होते,” हा भारतीय सभ्यतेनं लावलेला सर्वात मोठा शोध आहे, सर सांगू लागतात. आध्यात्मिक प्रेम ही एक वेगळीच संकल्पना आहे, वेगळया प्रतलावरील! आपले सारे नातेसंबंध आध्यात्मिक अर्थानं ऍटचमेन्ट किंवा आसक्ती ठरतात. म्हणून तर बुध्द सत्याच्या शोधात प्रेम लाथाडून नव्हे तर आसक्ती सोडून गेला, हे लक्षात घेतले पाहिजे. आध्यात्मिक प्रेम हे सर्वाभूती आहे. त्यात लाभ हानीचा विचार नाही.
जो खांडावया घाऊ घाली l
की लावणी जयाने केली ll
त्या दोहो एकचि सावली l वृक्ष दे जैसा ll
या जातकुळीचे हे प्रेम आहे.”
फूल बघितलं की त्याच्या सौंदर्याची प्रचिती येते. हवा छान पडली की सगळयांना त्याची प्रचिती येते. तसं काही तरी प्रेमाचं आहे, क्वांटिटी किती ते सोडून द्या पण त्याची प्रचिती येते.”
श्याम मनोहर बोलत होते. मधूनचबरं चाललंय ना हे’, असं विचारतही होते. घरात अंधार पडला होता पण दिवा लावण्याचे भान कोणालाच उरले नव्हते. हे सारं काही फारच बरं चालल्याची खूण होती. किती ते सोडा, पण एक उजळलेली समज घेऊन दीपरेखातून बाहेर पडत होतो. आता जीपीएसची आवश्यकता उरली नव्हती
( दिव्य मराठी ' रसिक' पुरवणी - २९ मे २०१६ मध्ये प्रकाशित)

Tuesday, 21 October 2014

संगीत (?) संशयकल्लोळ



संगीत (?) संशयकल्लोळ
      उत्तम कथाकार असलेल्या चंद्रकांत गुरवांशी संध्याकाळी फिरायला जाताना होणारा संवाद हा माझ्या केतूरच्या वास्तव्यातला एक अविस्मरणीय भाग. आज त्यांनी सांगितलेली एक कथा आठवते.ही कथा त्यांनी नुकतीच वाचली होती. आज या कथेचा लेखक नेमका कोण हे मला स्मरत नाही.मला वाटते बहुधा शन्नांची असावी पण कथा मात्र माझ्या आजही लख्ख लक्षात आहे. दिवेलागण किंवा तत्सम काही नाव असलेली ही कथा. एक वानप्रस्थाश्रमाच्या टप्प्यातील जोडपे. एक मुलगा आहे या जोडप्याला पण तो नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने परगावी. या जोडप्याला लग्नानंतर बरेच दिवस मूल होत नसते, अगदी लग्न होऊन दहा बारा वर्षे झाली तरी पाळणा हलत नव्हता. एके दिवशी त्यांचा एक कौटुंबिक मित्र काही कामाच्या निमित्ताने त्यांच्याकडे येतो आणि आठ दहा दिवस राहून निघून जातो. त्या आसपासच तिला दिवस जातात. दोघेही आनंदतात.मुलगा होतो. मुलाच्या पाठीवर मात्र काही होत नाही. आता साठी ओलांडलेला तिचा नवरा तिला एकदा विचारतो, “एक विचारु?”
“विचारा ना,परवानगी कसली मागताय?”
विचारु की नको अशा संभ्रमात सापडलेला तो म्हातारा विचारतो,“मला खरं खरं सांग, आपला मुलगा कुणाचा आहे?”
आपला मुलगा नक्की आपलाच आहे की त्या मध्येच आपल्या घरी येऊन गेलेल्या मित्राचा,हा संशय जवळपास तीस वर्षे हा गृहस्थ मनात वागवत असतो. वारुळात फिरणा-या विषारी सापासारखा हा संशय त्याच्या अबोध मनात सतत वळवळत असतो पण त्याचं सभ्य सुसंस्कृत मन आणि बायकोवरला इतक्या वर्षाचा विश्वास (?) त्याला हा प्रश्न विचारायला परवानगी देत नसतो. पण अखेरीस हा साप बाहेर पडतो एका जळजळीत प्रश्नाच्या रुपाने. या प्रश्नाने ती अंतर्बाह्य हादरते. हा माणूस इतकी वर्षे हा संशय मनात बाळगून माझ्याशी संसार करत होता,या वास्तवाने ती कमालीची व्यथित होते.ही व्यथा तिच्या थकल्या ह्रदयाला पेलत नाही आणि ती गतप्राण होते. संध्याकाळ आली,‘दिवेलागण झाली तरी हा सरपटत सरपटत सहजीवन पोखरणारा संशय पाठ सोडत नाही,हे सांगणारी ही कथा.

  स्त्री पुरुष नात्यातल्या या संशयाचे पोस्टमार्टम करावयाचे म्हणजे आपल्या पुरुषपणाचेच पोस्टमार्टम करणे आहे आणि ते सोपे नाही.हा पुरुष आपल्यामध्ये कधी जन्मतो ?त्याचा जन्म कधी होतो? स्त्री बद्दल बोलताना सिमॉन द बुवा म्हणालीच आहे,Woman is not born, she is made.” पुरुषाबाबतही थोड्याफार फरकाने असेच म्हणता येईल का ? मला माझ्याच आयुष्यातला एक प्रसंग आठवतो, माझे लग्न झाले त्या संध्याकाळची गोष्ट. मी आणि माधुरी फिरायला निघालो होतो आणि मला अचानक जाणवले की माधुरीबाबत अगदी कॉन्शियस झालो आहे. रस्त्यावरुन येणा-या जाणा-याने तिच्याकडे कटाक्ष टाकला तरी मी अनकम्फर्टेबल होत होतो. खरे तर माझा प्रेम विवाह.लग्नापूर्वीही आम्ही अनेक वेळा मिळून फिरायला गेलो होतो पण आज मला काय झाले होते ? मी अचानक तिला सांगितले, “एका खांद्यावरुन पदर का घेतलास? पदर दोन्ही खांद्यावरुन घेत जा.” आज मागे वळून पाहतो तेव्हा मला जाणवते,माझा नवरा झाला होता.प्रियकराच्या भूमिकेतून मी एकदम नव-याच्या भूमिकेत जात होतो आणि सांधेबदल करताना माझी गाडी खडखडत होती आणि मी घरी,आजूबाजूला,शेजारी पाजारी पाहिलेले ऐकलेले अनेक नवरे क्षणार्धात माझ्या मनावर माझ्याही नकळत अधिराज्य गाजवू लागले होते आणि मी संमोहित झाल्यासारखा वागत होतो.
    स्त्री पुरुष नात्यामधला संशय हा खरे तर दुहेरी आहे म्हणजे पुरुषाच्या बाजूने घेतला जाणा-या संशया प्रमाणेच स्त्रीच्या बाजूने घेतला जाणारा संशय हा ही एक आयाम त्याला आहे. पण एकूणच पुरुषसत्ताक कुटुंब आणि समाज व्यवस्थेत स्त्रीचा पुरुषावरील संशय हा गौण आणि बहुधा परिणामशून्य ठरतो. या विवेचनाचा रोख म्हणूनच एकूण पुरुषाच्या बाजूने घेतल्या जाणा-या संशयाकडे आहे. स्त्री पुरुष नात्यातल्या या पुरुषी संशयीवृतीची मुळे पुरुषाच्या पुरुष असण्यात आणि पुरुष धार्जिण्या व्यवस्थेत दडली आहेत. इथल्या समाजव्यवस्थेने स्त्रीला स्वातंत्र्य नेहमीच नाकारले आहे. “न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती”, हे इथे उच्चरवाने नेहमी सांगितले गेले आहे. त्यामुळे इथल्या स्त्रीची कस्टडी नेहमी कोणत्या ना कोणत्या भूमिकेतील पुरुषाकडे दिली गेली आहे.
“बालपणामध्ये बापाचं नाव
तरुणपणामधी पती हा देव
म्हातारपणामधी पोरांना भ्याव !”
हे तिचे प्राक्तन आहे आणि ते इथल्या समाजव्यवस्थेने तिला बहाल केले आहे. मुळात कस्टडी या संकल्पनेत सुरक्षा आणि कशाची तरी चोरी होण्याचे भय अध्याह्रत आहे. त्या बरोबरच जिला सुरक्षा द्यावयाची वल्गना करावयाची तिचे वस्तुकरणही त्या विचारव्यूहाचा अपरिहार्य भाग आहे. स्त्री ही एक व्यवच्छेदक वस्तू आहे कारण ती सजीव आहे.तिला तिच्या स्वतःच्या भावना आहेत. तिच्याजवळच्या ज्या संपत्तीची चोरी होईल म्हणून तिचे संरक्षण केले पाहिजे असे तिच्या कस्टोडियनना वाटते त्या संपत्तीचा विनियोग स्वतःच्या इच्छेप्रमाणे करावयाची मनिषा तिच्या मनात येऊ शकते पण मुळात तिच्याजवळ हा विवेक आहे हे कस्टोडियन्स मान्य करत नाहीत.
     म्हणूनच स्त्रीच्या जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हा निर्णय घेण्याची जबाबदारी वेगवेगळा पुरुष कस्टोडियन पार पाडीत असतो. पण सुरक्षा कशाची? स्त्रीजवळ असे काय आहे की जे हरविण्याची या पितृसत्ताक समाजव्यवस्थेला भिती वाटते. परंपरेने स्त्रीचा एक आदर्श स्टिरिओटाईप तयार केला आहे. शील ही तिची खरी संपत्ती आहे आणि या शीलाची सारी संकल्पना योनिशुचितेभोवती गिरक्या मारत असते. आणि म्हणूनच या अनुषंगाने या विवेकहीन बाहुलीवर संशय घेत राहणे ही या कस्टोडियनची प्राथमिक जबाबदारी ठरते. स्त्री पुरुष नातेसंबंधातील संशय घेणारा पुरुष हा केवळ नवराच असतो असे नाही. कॉलेजमधून घरी उशीरा परतणा-या मुलीवर बाप संशय घेतो, भाऊ नजर ठेवतो आणि पुरुषी व्यवस्थेत तयार झालेली आईही बाप - भावाला सामील होते. मुलीने आपल्या मनाविरुध्द आंतरजातीय लग्न केले म्हणून झोपलेल्या मुलीच्या डोक्यात घाव घालून तिचा खून करणारा बाप किंवा तिच्या अंगावर ट्रॅक्टर घालून तिला चिरडणारा भाऊ ही अगदी अलिकडच्या काळातील महाराष्ट्रातील उदाहरणे आहेत. संशयावरुन मारहाण,खून म्हणजे स्त्रीचा स्वमताप्रमाणे जगण्याचा अधिकारही आपली पुरुषी मानसिकता आपल्याला मान्य करु देत नाही.
    स्त्री संदर्भातील ही कस्टोडिअनशीप केवळ कौटुंबिकच असते असे नाही. मोठ्या कॅनव्हासवर ती सोशिओपोलिटिकल ही असते. अलिकडचे लव्ह जिहादहे याचेच उदाहरण. इथे धार्मिक आणि राजकीय प्रस्थापित मंडळी हिंदू मुलींच्या निखळ वैयक्तिक निर्णयावर आक्षेप घेऊन थांबत नाहीत त्यात हस्तक्षेपही करत आहेत. कारण त्यांच वैयक्तिक बाब धार्मिक आणि राजकीय अस्मितेचा विषय म्हणून पाहिली जात आहे. स्त्रीच्या योनिशुचितेभोवती कुटुंब,जात,धर्म,समुदाय यांच्या अस्मिता जोडल्या गेल्याने या वेगवेगळ्या स्तरावर तिच्या वैयक्तिक आणि लैंगिक व्यवहाराचे नियंत्रण केले जाते.जातपंचायत हे याचेच उदाहरण.
    लग्नानंतर योनिशुचितेच्या संपत्तीची रखवाली नवरा नावाच्या पुरुषाकडे येते. योनिशुचितेच्या कल्पनेतूनच स्वामित्वाची भावना जन्म घेते. पुरुषप्रधान संस्कृतीने तिच्या केलेल्या वस्तुकरणाचा हा स्वाभाविक परिपाक असतो. या योनिशुचिता आणि स्वामित्वाच्या भावनेतून पडदा,बुरखा, स्त्री जननेंद्रियाचे विद्रुपीकरण या प्रकारांचा जन्म होतो. कारण नातेसंबंधातील निष्ठा आपण केवळ शरीर संबंधापुरती संकुचित करुन टाकली आहे. त्यामुळे नात्यात आलेल्या दांभिकतेमुळे स्त्री पुरुष संबंध हा अनेकदा लहान मुलांचा चोर पोलिसांचा खेळ होऊन बसतो.
मी कोर्टी आरोग्य केंद्रात काम करित असताना या स्वामित्व आणि स्त्री शरीरावरील हक्काचा विलक्षण किळसवाणा प्रकार मी पाहिला होता.
    एकेदिवशी माझ्या ओपीडीत एक पन्नाशीचे गृहस्थ म्हणजे आपला गावाकडील शेतकरी गडी त्यांच्या सूनेला घेऊन आले होते.तिला काही तरी त्रास होत होता. मी तपासून औषधोपचार दिला. सून ओपीडीच्या बाहेर गेली पण हा गडी तसाच उभा.
“ काही काम आहे का ?”, मी विचारले.
“जरा खाजगी काम व्हतं...”, असं म्हणत ते बोलू लागले, “ ही माझी सून हाय.रांडव हाय” मला कळेचना हे काय सांगताहेत पण ते पुढं बोलतच राहिले, “ अलिकडे तिचा पाय वाकडा पडाया लागलाय.”
“ तुम्ही का सांगताय मला?”
“अवो तसं नाय मी काय म्हनतू मी असताना तिनं कशापायी बाहेर शेन खावं ? आपल्या टोपल्यातील भाकरी हाय ती आपन शेजा-या पाजा-यांच्या ताटात का वाढावी ?”
यावर काय बोलणार?मी निव्वळ सुन्न बसलो होतो.
  स्त्री लैंगिकतेविषयीच्या पुरुषी कल्पना हे स्त्री विषयक संशयाचे आणखीन एक प्रमुख कारण आहे. स्त्री आणि स्त्री लैंगिकता या विषयी पुरुषांच्या मनात एक रहस्यमय कुतूहल आहे. यातून तिच्या लैंगिकतेविषयी भन्नाट फॅण्टसी अनेकदा पुरुषांच्या मनात नांदत असतात. तिच्या लैंगिकतेची अमर्याद क्षमता,मासिक पाळीच्या विशिष्ट कालावधीतील तिची अनावर आसक्ती या संदर्भात इतक्या लोककथा,समज,गैरसमज यातून तिला दावणीला बांधायची इच्छा पुरुषी मनात अधिक प्रबळ होत जाते.या सगळ्या समज गैरसमजातूनही तिच्या बद्दलचा संशय अधिक बाळसेदार होत जातो. स्त्रीची अमर्याद लैंगिक भूक तिला व्याभिचार करायला भाग पाडते असा एक समज अनेक पुरुषांच्या मनात असतो.माझा एक मित्र म्हणे,’स्त्री ही कधीही विश्वासपात्र असू शकत नाही. ती हमखास वाकड्या वाटेने गेलेलीच असते. एकदा त्याच्यावर वैतागून मी म्हणालो,”अरे तुझी आई ही सुध्दा एक स्त्रीच आहे हे कसे विसरतोस तू..?” त्यावर तो थंड पणे म्हणाला, “तिच्यावर तरी विश्वास कसा ठेवू?सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याच माहित असतात?”
 “ आमच्या पिढीला व्हर्जीन बायको मिळणे अलमोस्ट दुरापास्त आहे.”
  “पुण्या/मुंबईतील मुली व्हर्जीन भेटणे महाकठीण..!”
अशी अर्ग्युमेंटस अलिकडे कॉलेज पोरांकडून ऐकायला मिळतात. म्हणजे आजची मेट्रोसेक्शुअल म्हणवली जाणारी पिढीसुध्दा लॉस ऑफ व्हर्जिनिटी ची खंत करते आहे.पण तुमच्या व्हर्जिनिटीचे काय रे?’असा प्रश्न ही पिढी हसत हसत डक करते म्हणजे कौमार्य हा केवळ मुलींचा गुण आहे त्याची मुलांना त्याची आवश्यकता नाही कारण शील हे स्त्रीचे खरे सौन्दर्य पुरुषांचे मात्र कर्तृत्व हेच सौन्दर्य. अशी आपल्या व्यवस्थेने स्त्री पुरुष गुणवैशिष्ट्यांची रितसर विभागणी केली आहे.
    स्त्रीच्या या अवास्तव लैंगिकतेच्या पार्श्वभूमीवर पुरुषाच्या मनातील असुरक्षितता आणि लैंगिक संबंधातील पुरुषाची मर्यादा यामुळे त्याच्या मनातील न्यूनगंड अधिक गडद होतो. त्यातून संशयाची नवनवी वर्तुळे निर्माण होत राहतात. स्त्रीयश्च चरित्रम पुरुषस्य भाग्यम.... सारखे पारंपारिक विचार ते अधिक गर्द करत जातात.
   स्त्रीची धर्मव्यवस्थेने उभी केलेली प्रतिमा हा पुरुषी संशयकल्लोळाचा वेगळा अध्याय आहे. मोहाचे दार,पापाची खाण,मोक्षातील अडचण अशा विशेषणांनी धर्माने संतांनी स्त्रीला गौरविले आहे. या सगळ्या प्रतिमेतून स्त्रीचे स्खलनशील रुप धर्मव्यवस्थेने अधोरेखित केले आहे. या सा-या घटकांनी पुरुषाच्या संशयी वृत्तीला खतपाणी घातले आहे पण या संशयाने स्त्री पुरुष नातेसंबंध पोखरले गेले आहेत. त्याचा पायाच भुसभुशीत झाला आहे. 
 या संशयाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याकरिता आपल्याला काय करायला हवे ? हा चक्रव्यूह आपण भेदू शकू ?
   हा चक्रव्यूह भेदणे सोपे नाही पण अशक्य नाही. आपल्याला आपल्या पारंपारिक पुरुषत्वाचा एक एक पदर त्यासाठी उकलावा लागेल. नव्या बदलत्या काळात हे आव्हान अधिक कठिण झाले आहे. आजच्या किमान शहरी जगात पारंपारिक कुटुंबव्यवस्थेचे पहारे तुटून पडत आहेत.चूल आणि मूल या मर्यादित क्षेत्रात अडकलेली स्त्री विशाल जगात बाहेर पडली आहे. अर्थार्जनातून आलेल्या आत्मविश्वासातून तिची कुटुंबातील भूमिका अधिक असर्टीव होते आहे. नव्या ग्लोबल जगात ती हवीहवीशी मोकळिक अनुभवते आहे पण त्याचवेळी जगभर पसरलेल्या मार्केटमध्ये तिचे वस्तूकरणही कल्पनातीत वेगाने होते आहे. आता लैंगिक संबंधाभोवतीचा पारंपारिक सॅक्रेडनेस विरु लागला आहे. पण त्यामुळेच स्त्री पुरुष शरीर संबंध अधिक अधिक किरकोळ स्वरुपाचे होत चालले आहेत. या नव्या पार्श्वभूमीवर अद्याप परंपरेची कात पुरती न टाकलेला पुरुष पुरता भांबावला आहे आणि स्त्री पुरुष संबंधांचे आभाळ संशयाच्या धुराने व्यापून जावे अशी परिस्थिती आज समोर उभी ठाकली आहे. फॅमिली कोर्टात ट्रॅफिक जॅम व्हावे एवढी गर्दी झाली आहे,संशयाच्या धुराने प्रत्येकाचे डोळे चुरचुरत आहेत.
    अशावेळी स्त्री पुरुष नातेसंबंधांची व्याख्याच आपल्याला नव्याने समजावून घ्यायची आवश्यकता आहे.बट्रांड रसेलने नेमके म्हटले आहे,The essence of a good marriage is respect for each other's personality combined with that deep intimacy, physical, mental and spiritual, which makes a serious love between man and woman the most fructifying of all human experiences.  Such love, like everything else that is great and precious, demands its own morality, and frequently entails a sacrifice of the less to the greater; but such sacrifice must be voluntary, for where it is not, it will destroy the very basis of the love for the sake of which it is made.”
 आपले नाते केवळ स्कीन डीप असता कामा नये. त्यासाठी स्त्रीला प्रथम समान योग्यतेची माणूस म्हणून समजून घ्यायला हवे. आपण तिचे कस्टोडियन नाही हे उमजायला हवे. परस्परांच्या शारिरिक,मानसिक गरजा समजावून घ्यायला हव्यात त्यांच्या पूर्ततेचा प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवा म्हणजे म्हणजे नात्यातला दांभिकपणा कमी होईल.रसेलने म्हटल्याप्रमाणे आपल्या नात्याला मानसिक,भावनिक आणि ख-या अर्थाने आध्यात्मिक आयामही मिळायला हवेत. शरीर संबंधांना पावित्र्याचे नाहक वलय नको,पण त्यांचा केवळ पोरखेळ होऊन जाऊ नये याची काळजी आपल्याला घ्यावयाची असेल तर आपल्याला आपल्या नात्याचा पाया अधिक भक्कम,अधिक व्यापक करायला हवा. योनिशुचितेच्या भ्रामक कल्पनातून बाहेर यायला हवे. शरीर संबंधातील एकनिष्ठतेहून या ह्रदयीचे त्या ह्रदयी होणा-या प्रक्रियेने आपले नाते अधिक श्रीमंत होत असते,हे आपण समजावून घ्यायला हवे. पारंपारिक विवाह संस्थेकडून झालेल्या अपेक्षाभंगातून आपण लिव्ह इन रिलेशनशिप सारखे प्रयोग ही सुरु केले आहेत. पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या ओझ्यात दबलेल्या स्त्री पुरुष नातेसंबंधातील हरवलेले चैतन्य पुन्हा शोधण्याचा हा प्रयत्न आहे अर्थात पुरुषसत्ताक,पितृसत्ताक व्यवस्थेचा पाया उखडल्याशिवाय नवा इमला रचता येणार नाही,हे ही तेवढेच खरे.
असे झाले तरच या अनादि कालापासून सुरु असलेल्या या संगीत संशयकल्लोळ नाटकाचा अखेरचा पडदा पडेल.
- डॉ.प्रदीप आवटे.
( ' पुरुष उवाच ' दिवाळी अंक २०१४ मध्ये प्रकाशित )