Wednesday 26 June 2024

शाहू महाराजांनी दाखवलेली लोककल्याणकारी वाट - प्रदीप आवटे.


            
    शाहू महाराज यांची आज जयंती. आजच्या या दिवसेंदिवस विखारी होत चाललेल्या वातावरणात शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा एक धावता आढावा घेऊ. महाराजांनी केलेले काम आजच्या काळात आपल्याला योग्य रस्ता दाखविणारे आहे

अवघ्या २८ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत एक लोककल्याणकारी, भेदभावरहित, सर्वांना प्रगतीचे संधी देणारे राज्य शाहू महाराजांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या कामाचा हा एक अगदी धावता आढावा.

शिक्षण प्रसार -

  • ·       १९१७ ते १९२२ – राज्याचा २३ टक्के निधी शिक्षणावर खर्च .
  • ·       शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.
  • ·       ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेशीर तरतूद केली.
  • ·       गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. 

जातिभेद आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य -

  •         जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
  •        अस्पृश्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, दुकाने हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवण यंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्यास सुरुवात केली गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्य वस्तीत चहाचे दुकान काढून दिले
  •        अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली.
  •        अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळया शाळा भरवण्याची पद्धत १९१९ मध्ये बंद केली.
  •        मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व तिची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्याकडून अहवाल मागविले.
  •        शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी (तत्कालीन) अस्पृश्यांना समानतेने वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला.
  •         डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते.

स्त्री उध्दाराचे कार्य -

  •        स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. 
  •        १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
  •        त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठीही कायद्याची निर्मिती केली.
  •        धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती. परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत बंद पाडली.
  •        जातिभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ १०० मराठा-धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्याच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक व दर्जा मिळवून दिला.

गुन्हेगार समजल्या जाणा-या जातीजमातीसाठी कार्य -

  •        त्या काळातील परिस्थितीमध्ये जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या, दरोड्यांचा मार्ग अवलंबला.
  •        ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे.
  •        शाहू राजांना या लोकांविषयी कणव होती. कारण ते खऱ्या अर्थाने सर्व जनतेचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातींच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केले. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. या भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली. पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले.

मुस्लिम समाजासाठी केलेले कार्य -

  •        शिक्षणासाठी इच्छुक मुस्लिम समाजातील १० विद्यार्थ्यांना कोल्हापुरात स्थापन झालेल्या ‘विक्टोरिया मराठा बोर्डिंग’मध्ये प्रवेश देऊन त्यांनी मुस्लिमांच्या शिक्षणास सुरुवात करून दिली.
  •        या १० विद्यार्थ्यांमध्ये कर्नाटकातील अथणी गावचा शेख मोहम्मद युनूस अब्दुल्ला या नावाचा विद्यार्थी होता. या विद्यार्थ्याने राजाराम महाविद्यालयातून पदवी मिळविल्यावर त्याला महाराजांनी आपल्या संस्थानात मामलेदार म्हणून नियुक्त केले. तसेच मुस्लीम समाजाला शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचे काम त्याच्यावर सोपवले.
  •        सन १९०६ साली शाहू महाराजांनी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित मंडळींची सभा बोलावून ‘मोहमेडन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. स्वतः महाराज या संस्थेचे अध्यक्ष झाले व युसुफ अब्दुल्लांना कार्यवाह केले. मुस्लीम बोर्डिंग सुरू करण्यात आले.
  •        महाराजांनी या समाजाच्या विविध धार्मिक स्थळांचे उत्पन्न मुस्लीम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा आदेश काढला. कसबा रुकडी, पेटा हातकणंगले येथील श्री हजरत पीर दर्गा व कोल्हापूर शहरातील निहाल मस्जिद, घोडपीर, बाबू जमाल व बाराइमाम या देवस्थानचे उत्पन्नही मुस्लीम बोर्डिंगला देण्यात आले. या शाळेसाठी शहरात मराठा बोर्डिंग जवळच २५ हजार चौरस फुटांची मोकळी जागा देऊन इमारतीसाठी साडेपाच हजार रुपयांची देणगी व संस्थानातील जंगलातून मोफत सागवान देण्यात आले. ही एकूण मदत मराठा बोर्डिंगपेक्षाही अधिक होती.
  •        पाटगावच्या मौनी बुवांच्या मठाच्या उत्पन्नातून काही रक्कम तेथील मुसलमानांच्या मशिदीच्या बांधकाम खर्चासाठी म्हणून देण्याचा एक हुकूम शाहू महाराजांनी काढला.
  •        रुकडीतील पिराच्या देवस्थानच्या उत्पन्नातील काही भाग तेथील अंबाबाईच्या मंदिरातील दैनंदिन सेवेसाठी खर्च होत होता. अशी अनेक उदाहरणे शाहू महाराजांच्या मुस्लीम समाजाच्या उद्धारासाठी असलेल्या धोरणातून दिसून येतील.
  •        मंदिरांच्या उत्पन्नातील भाग हा मुस्लीम समाजाच्या शिक्षणासाठी व मुस्लीम धर्म स्थळांच्या उत्पन्नातील वाटा हा हिंदू मंदिराच्या खर्चासाठी देण्याचे हे धोरण आजच्या राजकर्त्यांना व समाजात द्वेष पसरवणाऱ्या शक्तींना पुरून उरणारे आहे.
  •        शाहू महाराजांच्या कन्या अक्कासाहेब महाराज यांच्या विवाह प्रसंगी मराठा वधू-वरांचे अनेक विवाह लावले गेले, त्यासोबत काही मुस्लिम जोडप्यांचेही विवाह लावण्यात आले. या नवविवाहित जोडप्यांच्या आयुष्यभरच्या उदरनिर्वाहाची व्यवस्थाही करण्यात आली.
  •        मुस्लिम पवित्र धर्मग्रंथ कुराण अरबी भाषेत असल्याने त्याचा अर्थ सामान्य मुस्लिमांना समजत नव्हता. कुराणातील धर्म तत्त्वे सामान्य मुस्लिमांनाही समजली पाहिजेत यासाठी पवित्र कुराणचे मराठी भाषांतर करण्याचे काम महाराजांनी सुरू केले होते. याकरिता दरबारातील २५ हजार रुपयांची मोठी रक्कम खर्ची घातली होती. महाराजांचे अकाली निधन झाल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही.
  •        शाहू महाराजांनी नव्याने वसविलेल्या शाहूपुरी पेठेत मशीद नव्हती. तेव्हा तेथील मुस्लिमांच्या सोयीसाठी महाराजांनी जागा तर दिलीच शिवाय मशीद बांधकामासाठी एक हजारांहून अधिक रक्कम दान केली. बोहरी हे मुस्लीम समाजातील सधन व व्यापारी होते, पण त्यांना समाजासाठी स्वतःची मशीद नव्हती तेव्हा बोहरींचे पुढारी तय्यबली यांनी महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली. महाराजांनी शहराच्या मध्यवस्तीतील पाच हजार चौरस फुटांची जागा बोहरींच्या मशिदीसाठी दिली.
  •        महाराजांनी राधानगरी हे नगर नव्याने बसवले होते. त्या ठिकाणी हिंदूंसाठी दोन मंदिरांच्या बरोबरच मुस्लिमांसाठी हजरत पीर गैबी साहेब आणि शहाज महाल ही दोन देवस्थाने निर्माण केली. त्यांना उत्पन्न जोडून दिले व या देवस्थानांना ७५ रुपयांची विशेष देणगीदेखील दिली.
  •      त्याकाळी ब्रिटिश इंडियामध्ये इतर भागांत दंगली होत होत्या पण छत्रपती शाहू महाराजांच्या काळात केव्हाही धार्मिक दंगली झाल्या नाहीत. ही शाहू महाराजांच्या धोरणांचे यश होते.  
  •       १५ एप्रिल १९२० रोजी नाशिक येथे केलेल्या भाषणात शाहू महाराज म्हणतात, “मुंबई, सोलापूर, अहमदाबाद, अमृतसर, लाहोर वगैरे ठिकाणी जे दंगे झालेत त्यात सुशिक्षित पुढारी मागे राहून गरीब लोकांवर प्रसंग आला, याचे कारण त्यांचे अज्ञान आहे. पुढाऱ्यांचा कावा त्यांना समजला नाही. लोकांना थोडे जरी शिक्षण असते, तरी असे प्रकार झाले नसते.”
  •         त्याच भाषणात पुढे ते म्हणतात, “आमचे खरे महात्मा बादशहा अकबर शहा हेच आहेत. ज्याने हिंदू मुसलमानांची एकी केली व स्वतः जोधाबाई नावाच्या रजपूत स्त्रीशी लग्न करून तिला हिंदूच राहू दिले व सूर्याला अर्घ्य देण्याकरिता लाखो रुपये खर्च करून व्यवस्था केली. त्याची साक्ष हल्ली आग्र्याचा किल्ला देत आहे. जी गोष्ट विसाव्या शतकात अशक्य झाली आहे ती सतराव्या शतकात यवन बादशहाने शक्य केली होती.”
  •        शाहू महाराजांच्या भाषणातील हा उतारा आपण समजून घ्यावा असा आहे , “राज्य संपादन करण्याच्या महत्त्वाकांक्षेने पूर्वी या देशात लढाया झाल्या. अकबर, शिवाजी महाराज वगैरे महात्म्यांच्या काळी धर्मद्वेषाने किंवा जातीद्वेषाने कोणी लढाया करीत नसत. अकबर बादशहाच्या पदरी मराठी रजपूत इतर हिंदू सरदार व लढवय्ये होते. विजयनगरच्या राजाच्या पदरी किंवा शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमानांची संख्या कमी नव्हती या सर्वांनी स्वधर्मियांबरोबर किंवा स्वजातीयांबरोबर लढण्याच्या प्रसंगीदेखील आपले इमान कायम राखले अशा वेळी त्यांचे बंधुप्रेम चांगल्या प्रकारे दिसून येई.”

इतर कार्य –

  •        १८९६चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता 'असा राजा होणे नाही' असेच प्रजेला वाटते.
  •       शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.
  •        कला, कुस्ती यांना प्रोत्साहन दिले.  चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.

असा लोककल्याणकारी राजा आपणां सर्वांना आजही आदर्शवत आहे. शाहू महाराजांची केवळ जयंती साजरी करुन , त्यांना वंदन करणे पुरेसे नाही, सर्वांना सोबत घेऊन चालण्यासाठी जी वाट त्यांनी दाखवली, त्या वाटेने आपण चालत राहणे हीच शाहू महाराजांना खरीखुरी श्रध्दांजली आहे.

( संदर्भ – मराठी विश्वकोश,  शाहू महाराज गौरव ग्रंथ इत्यादी)

*******


4 comments:

  1. अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते, योग्य माहिती आहे, धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

      Delete
  2. कल्याणकारी राजा

    ReplyDelete
  3. छान आणि मुद्देसूद मांडणी... शाहू राजांना 150 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन,..💐💐💐🙏🙏🙏

    ReplyDelete