Monday 5 February 2024

अँटिबायोटिक्स निरुपयोगी होताहेत, सावधान ! - डॉ. प्रदीप आवटे.

वैश्विक खेडे झालेल्या या जगासमोर कोणकोणती आव्हाने आहेत आणि त्या आव्हानांना मानव समाज म्हणून आपल्याला कसे तोंड देता येईल, या संदर्भात विविध आंतरराष्ट्रीय संस्था महत्त्वाचे काम करत असतात. आरोग्याच्या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना देखील हे काम करत असते. आजच्या जगासमोरील सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मानवतेला भेडसावणारे जे दहा महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये सूक्ष्मजीव विरोधी औषधांना निर्माण होणारा वाढता प्रतिरोध (ॲन्टीमायक्रोबियल रजिस्टन्स) हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. शाश्वत विकासाची जी ध्येये आपण गाठू इच्छितो त्या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या अडचणींपैकी ही एक महत्त्वाची अडचण आहे.

 सूक्ष्मजीव विरोधी औषधांमध्ये अँटिबायोटिक्स, विषाणूविरोधी औषधे, बुरशी विरुद्ध काम करणारी औषधे आणि परजीवी विरुद्ध काम करणारी औषधे अशा अनेक प्रकारच्या औषधांचा समावेश होतो. सध्या या सर्वच औषधांना वेगाने प्रतिरोध वाढताना दिसतो आहे. त्यामुळे अनेक किंवा सर्वच प्रकारच्या औषधांना जुमानणारा सुपरब ही केवळ विज्ञान कथेतील काल्पनिक बाब राहिलेली नसून हा सुपरबग जगभर अनेक रुग्णांमध्ये आढळतो आहे. महत्वाची अशी अँटिबायोटिक्स या प्रतिरोधामुळे निकामी होत असल्याने दिवसेंदिवस जंतुसंसर्गावर उपचार करणे कठीण होत चाललेले आहे कारण नवीन अँटिबायोटिक्स फार सहजतेने मिळत नाहीत. नवीन अँटिबायोटिक्स शोधण्यासाठी संशोधन प्रक्रियेचा खर्च देखील अव्वा की सव्वा आहे त्यामुळे या प्रकारातील नवीन औषधे सापडण्याचा वेग अत्यंत मंद आहे. अनेक गरीब देशांना संशोधनासाठी एवढा खर्च करणे परवडत देखील नाही. अशावेळी आपण आपल्या हातातील आहे ती उपयुक्त सूक्ष्मजीव विरोधी औषधे गमावणे अत्यंत आत्मघातकी आहे. यामुळे जंतू संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणे कठीण तर होतेच आहे पण त्याचबरोबर सिजेरियन शस्त्रक्रिया, सांधे बदलण्याच्या शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील किमोथेरपी, अवयव प्रत्यारोपण अशा माणसाला संजीवन देणाऱ्या महत्त्वाच्या शस्त्रक्रिया करणे देखील दिवसेंदिवस अधिक जोखमीचे होत चालले आहे.



सूक्ष्मजीव विरोधी औषधांना प्रतिरोध निर्माण होण्याची मुख्य कारणे काय आहेत ?

·       या औषधांचा बेसुमार,वारेमाप वापर हे त्याचे मुख्य कारण आहे. ही औषधे जपून आवश्यक तेव्हाच आणि योग्य प्रमाणात योग्य कालावधी करता वापरली पाहिजेत परंतु असे होताना दिसत नाही.

·       स्वच्छ पाणी, सार्वजनिक स्वच्छता यांचा अभाव हे देखील असा प्रतिरोध वाढण्याचे एक मुख्य कारण आहे.

·       आरोग्य संस्थांमध्ये आणि शेतामध्ये जंतुसंसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण संदर्भातील परिणामकारक उपाययोजना न राबवणे.

·       गुणवत्तापूर्ण आणि सर्वसामान्यांना परवडणारी औषधे, लसी प्रयोगशाळा चाचण्या सहजतेने उपलब्ध नसणे.

·       सूक्ष्मजीव विरोधी औषधांना होत असलेल्या प्रतिरोधाबाबत जागृती आणि माहिती नसणे.

·       या संदर्भातील विविध कायद्यांचे काटेकोर पालन न केले जाणे.

  अशा अनेक कारणांमुळे हा प्रतिरोध वाढतो आहे. सूक्ष्मजीव विरोधी औषधांना निर्माण होणारा प्रतिरोध ही काही प्रमाणामध्ये निसर्गतः होणारी गोष्ट आहे. आपल्यामध्ये आवश्यक ते जनुकीय बदल करून सूक्ष्मजीव हा प्रतिरोध निर्माण करतात हे खरे आहे तथापि वर नमूद केलेल्या कारणांमुळे या प्रतिरोधाचे प्रमाण विलक्षण गतीने वाढते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

सूक्ष्मजीव विरोधी औषधांना निर्माण होणारा प्रतिरोध नेमक्या कोणत्या औषधांना आणि कोणत्या सूक्ष्मजीवांचा आहे याची अचूक माहिती मिळून त्यानुसार कार्यवाही करणे शक्य व्हावे यासाठी जागतिक पातळीवर या संदर्भात सर्वेक्षण यंत्रणा तयार करण्यात आलेली असली तरी देखील हे सर्वेक्षण अजून पुरेसे विश्वव्यापी झालेले नाही. जगातील कसेबसे पन्नास एक देश यासंदर्भातील माहिती गोळा करत आहेत.

अँटिबायोटिक्स ना निर्माण होणाऱ्या या प्रतिरोधामुळे टीबी अर्थात क्षय आजाराचे नियंत्रण अधिक कठीण झाले आहे. टीबीवरील अनेक औषधांना दाद न देणारे लक्षावधी रुग्ण जगभरात आढळून येत आहेत. भारतासाठी ही परिस्थिती अधिक आव्हानात्मक आहे कारण जगभरातील एकूण टीबी रुग्णांपैकी सुमारे २५ टक्के रुग्ण आपल्या देशात आढळतात. आज रोजी देशभरात जवळपास २८ लाख टीबी रुग्ण आहेत. टीबी रुग्णांमध्ये प्रतिरोधाचे प्रमाण सुमारे चार ते पाच टक्के आहे. टीबी रुग्णांमधील अँटिबायोटिक्स प्रतिरोधाचे हे प्रमाण असेच वाढत गेले तर टीबी नियंत्रण आपल्याकरता कठीण गोष्ट होऊन बसणार आहे. १९५०च्या पूर्वी ज्याप्रमाणे टीबी रुग्णांसाठी शहराबाहेर वेगळी रुग्णालय असत ती अवस्था येण्याचा धोका या प्रतिरोधामुळे निर्माण झालेला आहे.एच आय व्ही एड्स वरील औषधांमध्ये देखील प्रतिरोध निर्माण होताना दिसतो आहे. मलेरिया साठी कारणीभूत असलेल्या परजीवींपैकी अधिक धोकादायक असणाऱ्या फाल्सीपारम मलेरियामध्ये नेहमीच्या औषधाविरुद्ध निर्माण होणारा प्रतिरोध मलेरिया नियंत्रणातील मोठा अडथळा आहे.

अँटीबायोटिक्सच्या वापराबाबतची भारतातील परिस्थिती आपण सर्वांनी काळजी करावी अशी आहे २०१० ची जरी आकडेवारी आपण पाहिली तरी अँटिबायोटिक्सची जवळपास 13 अब्ज युनिट्स आपण देशभरात वापरली. याचा अर्थ सर्व जगभरात भारतातील अँटिबायोटिक्सचा वापर सर्वाधिक आहे.भारतात अँटिबायोटिक्सना वाढत्या प्रतिरोधाची कारणे आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.

 आपल्याकडे मेडिकल स्टोअर मध्ये डॉक्टरांच्या कोणत्याही प्रिस्क्रिप्शन शिवाय अँटिबायोटिक्स सहजतेने उपलब्ध होतात. दुकानदाराच्या किंवा इतर कोणाच्यातरी सल्ल्याने अनेकदा रुग्ण स्वतःहून अँटिबायोटिक्स घेतात अँटिबायोटिक संवेदनशीलता चाचणी किंवा ब्लड कल्चर यासारख्या प्रयोगशाळा तपासण्या सहजतेने उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा डॉक्टर आपल्या अनुभवानुसार अँटिबायोटिकचा वापर करत असतात. प्रमाणापेक्षा जास्त  वापर करण्यासोबतच अनेकदा ती अपुऱ्या डोस मध्ये दिली जाणे, यामुळे सुद्धा प्रतिरोध निर्माण होतो. रुग्णाला कदाचित बॅक्टेरियामुळे संसर्ग झाला असेल आणि तो आपल्याकडून उपचार करावयाचा राहू नये या भीतीने अनेकदा डॉक्टर गरज नसताना रुग्णाला अँटिबायोटिक्स देतात. अँटिबायोटिक्स वापराबाबत अन्न आणि औषध प्रशासनाची नियामक यंत्रणा अपुरी असल्यामुळे तसेच मनुष्यबळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने याबाबतचे नियमन काटेकोरपणे केले जात नाही हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मानवी आरोग्य विभागाशिवाय अँटिबायोटिकचा वापर पशुसंवर्ध,न मत्स्य उत्पादन, शेती यामध्ये देखील केला जातो. अनेकदा तो पशु, मासे किंवा धान्य याच्या निव्वळ वाढीसाठी केला जातो. औषध कंपन्यांमधून बाहेर पडणा-या कचऱ्यामुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण देखील अँटिबायोटिक्स प्रतिरोधाला हातभार लावते.



सूक्ष्मजीव विरोधी औषधांना निर्माण होणारा प्रतिरोध थांबवण्यासाठी शासकीय पातळीवर आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. बाराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये या अनुषंगाने एक राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. २०१७ मध्ये आपण हा प्रतिरोध रोखण्यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा तयार केला आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर योग्य पावले उचलली जातच आहेत. मानवी आरोग्य,शेती, मत्स्य उत्पादन, पशुसंवर्धन आणि पर्यावरण हे सारे विभाग एकमेकांशी समन्वय साधून याबाबतीत योग्य कार्यवाही करत आहेत मात्र या सगळ्या गोष्टी आपण केवळ शासनावर सोडून चालणार नाहीत. आपले आरोग्य ही आपली व्यक्तिगत आणि कौटुंबिक जबाबदारी देखील आहे आणि म्हणून आपल्या आजारपणामध्ये उपयोगी पडणारी सूक्ष्मजीव विरोधी औषधे आपल्या निष्काळजीपणामुळे निकामी होऊ नयेत. यासाठी आपण देखील आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे.

 

ॲन्टीबायोटिक्स वाचविण्यासाठी आपण काय करू शकतो ?

 

o  डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय कधीही स्वतःच्या मनाने अँटिबायोटिक्स घेऊ नयेत.

o  आपल्याला अँटिबायोटिक्स द्या असा आग्रह आपण डॉक्टरांना करू नये.

o  अँटिबायोटिक्स कोणत्या डोसमध्ये आणि किती काळाकरता घ्यावयाचे याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

o  आपला उपचार पूर्ण झाल्यानंतर अँटीबायोटिक्सच्या काही गोळ्या, औषधे शिल्लक असतील तर ती इतर कोणाला देऊ नयेत. अँटीबायोटिक्स ओळखण्याची खूण म्हणजे या औषधांच्या स्ट्रीपच्या मागे लाल रंगातील जाड रेघ ओढलेली असते.




o  आपल्याला जंतुसंसर्ग होऊ नये याकरिता हातांची नियमित स्वच्छता, अन्न आरोग्यदायी पद्धतीने तयार करणे, आजारी माणसाशी निकट संपर्क टाळणे, सुरक्षित शरीरसंबंध आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक लसीकरण वेळेवर पूर्ण करणे, आवश्यक आहे.

o  आपण आपले अन्न तयार करताना जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेले पाच मुद्दे लक्षात ठेवावेत. स्वच्छता, कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ वेगवेगळे ठेवणे, अन्न पूर्ण शिजवणे, तयार झालेले अन्न योग्य तापमानामध्ये ठेवणे, अन्न तयार करण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित पाणी कच्चे पदार्थ वापरणे.

 

समाज, शासन आणि व्यक्ती म्हणून आपण हातामध्ये हात घेऊन काम केले तर सूक्ष्मजीवाविरुद्ध लढणारी आपली औषधे आपण सुरक्षित ठेवू शकू आणि आपले आरोग्य देखील जपू शकू. म्हणूनच याबाबतीत सर्वसामान्य नागरिक, डॉक्टर्स, हॉस्पिटल्स पशुसंवर्धन मत्स्य उत्पादन आणि शेती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सूक्ष्मजीव विरोधी औषधांचा वापर काटेकोरपणे आणि नियमानुसारच करण्याची गरज आहे.

 

डॉ. प्रदीप आवटे 

No comments:

Post a Comment